Saturday, 2 July 2016

सद्‍गुरूची कामगिरी - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ 'मी स्वस्थ आहे' असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. 

शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात. 

रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ 'गाडी माझी आहे' म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. 

संतचरणी विश्वास । त्याने भगवंत जोडला खास ॥

- varkariyuva.blogspot.in

सासवड मुक्कामी रात्री २ पासूनच जोरदार पाऊस !

सासवड मुक्कामी रात्री २ पासूनच जोरदार पाऊसला सुरवात !  सकाळी ठीक ०८ ला माऊलींचे जेजुरीकडे प्रस्थान .

- varkariyuva.blogspot.in

श्री संत सोपान काका महाराज भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने प्रस्थान !

श्री संत सोपान काका महाराज यांनी काल भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले .

- varkariyuva.blogspot.in

आम्हां विठ्ठल एकचि देव - श्रीगुरु पु.ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

संतांनी आपल्या वाङ्मयामधून श्रीक्षेत्र पंढरीचे महत्व मोठ्या प्रमाणामध्ये वर्णिले आहे.पापविनाशक, पुण्यकारक,योगपीठ, मोक्षदात्री अशी परिणामदृष्टीने ही भूमी संपन्न असल्याची अनेक प्रमाणे सर्वच संतांनी सांगितले आहे.आणि म्हणून आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणा-या भक्तिरसाच्या सेवनासाठी आणि तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व संतक्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये येतात.जगत्कल्याणाची तऴमऴ घेऊन जमणारी ही मांदियाऴी अनवरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे.करीत आहे !
हीच वारी आहे. वारी म्हणजे सर्वात्मकाची स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा,सर्व संतांचे स्नेहमिलन,समष्टीकल्याणाची भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे,उपासकांनाच नव्हे,तर उपस्यालाही भावविभोर करणारी सर्वजनसुलभ अशी साधना आहे, वारकरी संप्रादायाचे हे वैशिष्ट्यच आहे, की येथे सर्वांना सर्व मिऴण्याची व्यवस्था आहे.

' यारे यारे लहानथोर ।
यातीभलते नारीनर ।
करावा विचार ।
न लगे चिंता कोणासी ।।'

असे अभिवचन श्रीतुकाराम महाराजांनीच दिलेले आहे.त्यामुऴे जातपात,धर्म,देश वगैरे भेदकारणांना बाजूला ठेवून सर्व जण येथे येतात.आणि सर्व विसरून एका आनंदामध्ये सुस्नात होत राहतात.'श्रीज्ञानेश्वरी' मध्ये म्हटले आहे,

' उठतिया आत्मप्रथा ।
हे भूतभेदव्यवस्था ।
मोडीत मोडीत पार्था ।
वास पाहे ।।'

हाच अनुभव वारीमध्ये अपेक्षित आहे आणि हेच संप्रदायाचे वैभवही मानले आहे.संत श्रीतुकाराम महाराजांनी हा अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे,

'वर्णाभिमान विसरली याति ।
एकएका लागतील पायी रे ।
निर्मऴ चित्ते झाली नवनीते ।
पाषाणा पाझर सुटती रे ।।'

किंवा,

' नर नारी याति हो कोणी भलती ।
भावे एका प्रीती नारायणा ।।'

म्हणूनच समाजातील सर्व घटक येथे एकोप्याने,समभावाने नांदतात,आनंद देतात-घेतात.येथे नरहरी महाराज,सावता महाराज,गोरोबाकाका,रविदासमहाराज असे विभिन्न जातींत अवताराला आलेले संत एकत्र येतात.त्यांचे प्रवृत्तीधर्मकार्य भिन्न असले तरीही येणा-या पारमार्थिक अनुभवामध्ये तरतमभाव नाही.सर्वांचा अनुभव एकच आहे आणि समाजकल्याणाची तऴमऴही सारख्याच तीव्रतेची आहे.विभिन्नतेमध्ये असणा-या एकतेची जाणीव करून देणे,हेच वारकरी संप्रदायाचे कार्य आहे आणि वारी हे त्याचे परिपक्व व्यापक असे रूप आहे.सर्वांमध्ये समानतेने,एकरूपतेने नांदणा-या भगवंताचे दर्शन हीच वारी !

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

- varkariyuva.blogspot.in