Monday 2 June 2014

तुळशी महात्म्य आणि त्या मागील विज्ञान - अक्षय भोसले

ज्ञानेशो भगवान विष्णू !


वारकरी संप्रदायात तुळशी अनन्यसाधारण महत्त्व आहे  . वारी आषाढीची असो वा कातिर्कीची, भक्तगण अखंड नामस्मरण करत या 'हरिप्रिया' तुळशीला डोक्यावर घेऊन नाचत असतात. वारीत लाखो भाविकांच्या मस्तकावर तुळस विराजमान झालेली दिसते. 
तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच. कारण भगवंताचा आठवा अवतार श्री कृष्ण आणि  नववा अवतार बद्ध अर्थात श्री विठ्ठल पांडुरंगाचा ! साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णवभक्तांनाही तिचे कमालीचे प्रेम. पांडुरंग हृदयात हवा, तशी प्रत्येकाच्या घरात तुळसही हवीच. हे नवे अद्वैत सांगताना संत नामदेव म्हणतात- 
 
तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
        तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। 
         तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी। 
         तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।। 

 याचा अर्थ असा कि ,
ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर, भयंकरच म्हणायला हवे, तिथे यमदूतांचे वास्तव्य असते, ते ईश्वराची आज्ञा म्हणून. ज्याच्या घरी तुळशीवृंदावन आहे, त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे. नामदेवांचा हा अभंग नीट वाचला तर त्यातील खरा अर्थ धामिर्कतेपेक्षा वैज्ञानिकच अधिक आहे, हे लक्षात येते. ज्याच्या घरी तुळस नाही, तिथे श्रीहरी नव्हे, तर यमदूत वास्तव्याला येणार आहेत हे त्यांचे सांगणे म्हणजे विज्ञानाला लपेटून घेणे आहे. 
तुळशीचे एक पानही त्रैलोक्यासमान आहे, असे सांगताना संत एकनाथांनी म्हटले आहे-
           
तुळशीने पान। एक त्रैलोक्यासमान। उठोनिया प्रात:काळी। वंदी तुळशी माऊली।। 
             मनींचे मनोरथ। पुरती हेचि सत्य। तुळशीचे चरणी। शरण एका जनार्दनी।। 

किंवा 
तुळशीची करिता सेवा। महाराज सांगतात. अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल, तर केवळ तुळशीचे पूजन करा -होय देवा प्रिय तो।
इतकेच नव्हे तर त्याच्या पुढे एकनाथ महाराज सांगतात. अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल, तर केवळ तुळशीचे पूजन करा -
सकाळीच उठून तुळशीला वंदन करायचे तर तुळस घरात असली पाहिजे. ते कशासाठी हे आयुवेर्दाने सांगितले आहे. तुळस आणि कडुनिंब ही झाडे अशी आहेत, की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन अधिक प्रमाणात बाहेर सोडला जातो. तुळशीच्या रोपाच्या ५० मीटर परीघातील हवा अत्यंत शुद्ध राहते. या क्षेत्रात ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने घरात पिसवा, हिवतापाचे जंतू, अन्य साथीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत. सकाळीच या तुळशीसमोर काही वेळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाते आणि दिनचर्या सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीराला होतो. मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणे शक्य होते. साहजिकच मृत्यूला आमंत्रण देणारे जीव-जंतूही घराच्या आसपासही फिरकत नाहीत. आणि घरात वास्तव्य राहते, ते प्रसन्न श्रीहरीचे. म्हणूनच नामदेवांनी म्हटले आहे की- 

तुळस असे ज्याचे द्वारीं। लक्ष्मी वसे त्याचे घरीं। 
येवोनि श्रीहरी। क्रीडा करी स्वानंदे।।
 जे तुळसी घालिती उदका।  ते नर पावती ब्रह्मासुख। 
  नामा म्हणे पंढरीनायका। तुळसीजवळी उभा असे। 
साक्षात स्वत : पंढरीनाथ तुळशी जवळ उभे असतात .
भगवंताच्या रूपाच वर्णन करताना तुकाराम महाराजांनी तुळशीचा उलेख्ख केला 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटेवरी ठेवोनिया॥
तुळशी हार गळा कासे पितांबर।
आवडे निरंतर हेची ध्यान॥

तुकाराम महाराजांनी तर तुळशीच्या पुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ मानल्या. त्यांची ख्याती ऐकून एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला आले. महाराजांनी मांडलेले विचार ऐकल्यानंतर शिवाजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तुकाराम महाराजांसाठी सुवर्णाच्या मोहरांचा नजराणा पाठवला. खरे आजकालचा एखादा साधू असता तर त्याने लगेच ते धन स्वीकारले असते. महाराजांना, शिवरायांना आशीर्वाद दिले, परंतु शिवरायांचा तो नजराणा स्वीकारला नाही. ते म्हणाले – राजे या धनाची गरज माझ्यापेक्षा अधिक हिंदवी स्वराज्याला आहे आणि अशा धनाची आस माझ्यासारख्या माणसाला उरलेली नाही. आता सोन्या-रूप्यात मन रमत नाही-

सोने रूपे आम्हा मृतीके समान।
माणिक पाशान खडे जैसे॥

सोने-चांदी हे आम्हाला मातीप्रमाणे आहे आणि माणिक-मोती म्हणाल, तर ते माझ्यासाठी दगड-धोंडय़ांसारखे आहेत.
येर तुमचे वित्त धन। ते मज मृती के समान॥
हे तुम्ही जे धन पाठविलेले आहे, ते माझ्यासाठी मातीसमान आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी विचारले, महाराज तुम्ही सुखी, आनंदी राहावे; म्हणूनच मी हा सुवर्णमुद्रांचा नजराणा पाठवला होता. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही सुखी व्हावे, आनंदी राहावे असे वाटत असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे. तुकाराम महाराज म्हणाले -

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी॥

आम्ही सुखी व्हावे, असे वाटत असेल तर तुळशीची माळ गळय़ात धारण करा आणि विठ्ठल नामाचा गजर करा. यावरून वारकरी संतांनी तुळशीला किती महत्त्व दिले आहे, हे लक्षात येते. बरे ही तुळस नेमकी आहे तरी कोण आणि ती भगवंतांला इतकी प्रिय असण्याचे कारण काय? याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात.
आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्वीकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनी तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

घरातल्या तुळशीचे महत्त्व ऑक्सिजनपुरते किंवा रोगप्रतिबंधक म्हणून नाही. इतर अनेक दृष्टीने ती आरोग्यदायिनी आहे. सर्दी -खोकला, घशाचे विकार यावर तुळस अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे जिवंत रोप आपल्या आरोग्याचे सतत रक्षण करीत असतेच, पण या तुळशीच्या माळा गळ्यात घातल्यानंतरही त्यांचे हे काम सुरूच राहते. म्हणूनच पांडुरंग आणि त्यांचे भक्त ही तुळशीमाळ नेहमी गळ्यात घालतात. आपले जीवन आरोग्यमय राहिले तर जन्म-मरणाचा फेराही चुकविता येईल अशी श्रद्धाच नव्हे तर विश्वास संत नामदेवांसह सर्वांना आहे. 
आता एकविसाव्या शतकात केवळ धर्म किंवा धामिर्क श्रद्धा म्हणून तुळशीकडे न पाहता तिचे 'आरोग्यदायिनी' हे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. पूवीर् घर हिंदूचे आहे, हे बाहेरच्या तुळशी वृंदावनावरून लक्षात येई. पण तिचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व वैष्णव वा हिंदूंपुरते मर्यादित नाही. बाहेर सतत वाढणाऱ्या प्रदूषणाला, स्वाईन फ्लूसारख्या नव्या नव्या साथीच्या रोगांना निदान घरापासून तरी दूर ठेवायचे असेल तर तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात हवेच. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांचे प्रदूषण कमी करायचे असेल, तर जागोजागी अखंड प्राणवायू पुरविणाऱ्या तुळशीवाटिका उभ्या करायला हव्यात. तुळशीचे हे वैज्ञानिक महत्त्व आपल्या लक्षात आले, तर 'तुलसीमहात्म्य' हा श्रद्धेचा विषय न राहता वैज्ञानिक चळवळीचा होईल. त्यामुळेच श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला तुळशी वाटप समारंभ अत्यंत स्तुत्य आणि इतरांकरिता आदर्श असा निर्माण केला आहे .
आपल्या प्रतिष्ठान कडून असेच समाज उपयोगी व वारकरी संप्रदाय प्रचार प्रसाराचे कार्य निरन्त असेच घडत राहो हि माऊली चरणी प्रार्थना  
तुळशीच महात्म्य सांगणारे अनेक अभंग आपणास संत साहित्यात पाहण्यास भेटतात त्या पैकी काही खालील प्रमाणे ,
तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥
तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । तें वर्जिलें यमर्किकरीं । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥
तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळां होतां स्मरण । जन्ममरण नाहीं नामा ह्मणे ॥३॥

२.
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥
तुळसीमाळा घाली गळां । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥
तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिकां न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पें न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥

३.
तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥
तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥
तुळसी दळ भूमीवरी पडिलें । तें जरी मस्तकीं वंदिलें । कोटी तीर्थस्नान केलें । एवढें फळ नामा म्हणे ॥३॥

४.
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥
तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
तुळसीचें काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥
तुळसीची कीर्ति अगाध पैं आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥

५.
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे ॥१॥
दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥
नामा ह्मणे हरि-एवढें । ब्रह्म वृंदावनीं सांपडे ॥३॥

६.
फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखें पद मागारे ॥१॥
एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांयां कां दवडारे ॥२॥
नामा ह्मणे हा देवो पहा रे । विठ्ठ भक्तांचा ऋणियारे ॥३॥

७.
तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर ॥१॥
तुळसीच्या दळीं । यम जिंकिला महाबळी ॥२॥
नामा ह्मणे बळिरे बळी । विठ्ठल आमचा भुजबळी ॥३॥

८.
उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥
तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥
तुळसीसी मंजुरा येतां । पळ सुटे यमदूतां । अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां । नासे दुरित चित्ताचें ॥३॥
जे जे तुळसी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख । नामा म्हणे पंढरीनायक । तुळसी जवळी उभा असे ॥४॥

सभार :- संत साहित्य , महाराष्ट्र टाईम्स , प्रहार .

तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !