।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।
संत-संग
मानवी जीवन हे संगप्रधान आहे. प्रत्येकाला कोणाचा
ना कोणाचा संग अपेक्षित आहे. संगरहित जीवनाची
माणूस कल्पनाही करु शकत नाही. एकट्याने राहणे
मानवाला शक्य नाही म्हणून तुरुंगवासाची कल्पना
अस्तित्वात आली.त्या संगासाठी माणूस काय करेल हे
सांगताही येणार नाही. केवळ माणसानेच नव्हे तर
तात्विक दृष्टीने विचार केला तर ब्रह्मालाही एकट्याने
करमले नाही. ‘स एकाकी न रमते’ असे उपनिषिदही म्हणते.
म्हणून ब्रह्मच जगद्रूपाने नटले. म्ह्णजे ब्रह्मालाही
एकट्याला राहणे जमले नाही. म्हणजे प्रत्येकालाच
संगाची अपेक्षा आहे. आपल्यामध्ये जे कमी आहे, त्याची
भरपाई जेथून होते त्याचा संग करणे मानसाला आवडते.मग
तो जीव असो, जड असो, देव असो अथवा संत असो.
त्याची संगत माणसाला घडते अणि त्या सम्गतीवर
त्याचे आयुष्य ठरते. जर संगती जडाची, जीवाची असेल तर
त्याला बरेचसे दु:खच प्राप्त होते, पण संतांची अणि
देवाची संगत घडली तर मात्र त्याला सुख अणि सुखरुपता
प्राप्त होते. मानवाच्या पारमार्थिक जीवनामध्ये
संतसंग हा अत्यंत महत्वाचा अणि आवश्यक मानला आहे.
देवाचा संग जीवला नेहमीच आहे, संतांचा संग मात्र दुर्लभ
आहे.
- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर