Wednesday 17 August 2016

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !

   ।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।। 

रक्षाबंधन

शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला ll1ll
अवघी साधनें हातवटी l मोले मिळत नाही हाटी ll2ll
अहो आपण तैसे व्हावे l अवघे अनुमानुनी घ्यावे ll3ll
ऐसे केले सद्गरूनाथे l बापरखुमादेवीकांते ll4ll
तेथें कोणी शिकवावे l सार साधूनियां घ्यावे ll5ll
लडिवाळ मुक्ताबाई l बीज मुद्दल ठीयीचे ठाईं ll6ll
तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll7ll

या अभंगातुन वयाने लहान असून देखिल संत मुक्ताबाईंचा  ज्ञानोबारायांप्रती मातृत्वभाव व धाकट्या बहिणीची मर्यादा कळुन येते.!
  ll जय ज्ञानोबाराय जय मुक्ताबाई ll

पूज्य श्री प्रमुख स्वामीमहाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !

स्वामी नारायण पंथाचे गुरुवर्य पूज्य श्री प्रमुख स्वामी महाराज यांचं देहावसान झाले. साधू कोणत्या हि पंथाचा असो त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे  कधी हि न भरून निघणारे नुकसान होते .
पूज्य स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ! व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

- अक्षय चंद्रकांत भोसले
Varkariyuva.blogspot.in

परमार्थ केव्हा करावा ? - पू.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात.कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे.आयुष्यभर संसार,व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा.म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे सहकारी 'म्हातारा' म्हणून संबोधतात.म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो.तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी असते.कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात.म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही.त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो.जगामध्ये असा विचार करणारे लोकच अधिक आहेत.त्यामुऴे प्रवचन-कीर्तनांना वयोवृद्ध लोकांची अधिक गर्दी असते.परमार्थ हा रिटायर्ड झाल्यानंतर करायचा असतो,हीच अनेकांची भावना असते.
पण ही भावना योग्य नाही. परमार्थाचे चिंतन बालवयातही होऊ शकते.संतांची चरित्रे पाहिली तर बालपणीच त्यांना परमार्थाची आवड होती असे आढऴते.समर्थ श्रीरामदासस्वामी बालपणी विश्वाची चिंता करीत असत.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वयाच्या सोऴाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला.त्यांना परमार्थात वयाची अडचण आली नाही.त्यांनी सोऴाव्या वर्षी लिहिलेले आपणांस वाचायला एकसष्ठावे वर्ष का ? असा प्रश्न नेहमीच पडतो.वास्तविक परमार्थाला वयाचे बंधन नसते.श्रीशुकाचार्यांनी तर गर्भातच संसाराचे स्वरूप ओऴखले होते.परमार्थ कधी करावा ? याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा ! कारण हा प्रश्न संसाराचे दु:ख कऴल्याशिवाय निर्माण होणार नाही.परमार्थ त्याच क्षणी  करावा.योगवसिष्ठांत प्रभू श्रीरामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ म्हणतात,
'अद्यैव कुरू यच्छ्रेयो वृद्ध : सन् किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ।।'
आजच आपले कल्याण करून घे.वृद्धापकाऴी काय होणार? म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते ! ज्याला आनंदाची प्राप्ती लवकर व्हावी असे वाटते तो तेवढ्या लवकर परमार्थाचे चिंतन करतो.म्हणून परमार्थ कधीही करता येतो.त्याला वयाचा विचार करण्याचे कारण नाही.परमार्थ कधी करावा ? उत्तर एकच - आत्ता !

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar