Saturday 30 January 2016

भूतकाळाचे स्मरण , वर्तमानाची जाणीव अणि भविष्याचे चिंतन यालाच विचार म्हणतात. - ह.भ.प. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

विचार

एका मानसशास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की माणसाने
दोन गोष्टींचा विचार नेहमी करावा, आपल्याला
काय करायचे आहे; अणि आपण काय करतो आहोत. यातून
आपल्या उद्दिष्टांचा विचार माणसाच्या मनात
कायम राहतो. त्याचा विसर पडत नाही. दुसरे, आपण
वर्तमानातही जगतो, वर्तमानाचाही विचार केला
जातो.व्याकरणाच्या दृष्टीने काळ तीन प्रकारचा
आहे.अणि या तीनही काळाचा मानवी जीवनाशी
संबंध आहे. माणूस केवळ एका काळात जगू शकत नाही. केवळ
भूतकाळात तो रमला तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल
होणार नाही. पण त्याचबरोबर तो भूतकाळ संपूर्णत:
विसरुही शकत नाही. केवळ वर्तमानातही तो जगू शकत
नाही. जरी कोणी वर्तमानात जगा म्हणून सांगत असेल
तरई विचारी माणूस नेहमीच वर्तमानात जगणार नाही.
त्याला भविष्यावर दृष्टी ठेवावीच लागेल. कारण
वर्तमानकाळातील परिणाम भविष्यकाळातच
आकाराला येतील अणि विचारी मनुष्य परिणामाचा
विचार नक्कीच करेल.केवळ भविष्यकाळाच्या चिंतनात
तो रमणार नाही. केवळ भविष्याचा विचार म्हणजे ते
कदाचित स्वप्न ठरेल. विचारी माणसाच्या बाबतीत हे
संभवणारच नाही.विचारवान मनुष्य तीनही काळाचा
विचार करीत असतो. किंबहुना तीनही काळाचा
विचार करतो त्यालाच विचारी म्हणतात. भूतकाळाचे
स्मरण , वर्तमानाची जाणीव अणि भविष्याचे चिंतन
यालाच विचार म्हणतात. अणि तसे झालेच तरच आपले
उद्दिष्ट आपणास प्राप्त होईल. भूतकाळाच्या स्मरणाने
वर्तमान निश्चित होईल अणि वर्तमानाच्या जाणिवेने
भविष्य उज्ज्वल होईल. हा विचारच मानवाला
समाधान देईल. म्हणून विचारवंतांनी किंवा
संतमहात्म्यांनी विचार करा म्हणून सांगितले आहे. श्री
तुकाराम महाराज म्हणतात -
विचारावाचुन । न पाविजे समाधान ।।

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर,पंढरपूर 



Friday 29 January 2016

खरे- खोटे जाणून खऱ्याचा स्वीकार अणि खोट्याचा त्याग याचे नाव विवेक ! - श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर


।। ज्ञानेशो भगवान विष्णु  ।।

विवेक

विवेक हा माणसाला अपेक्षित पण दुर्लभ असा गुण आहे.
माणसाचे सर्व म्हणजे सांसारिक अणि पारमार्थिक
जीवनाचा विवेक म्हणजे पाया आहे. मानवाचे लौकिक
जीवनही यावरच आधारित आहे. विवेक म्हणजे चांगल्या-
वाईटाचा निवाडा! खऱ्या-खोट्याचा निवाडा करणे
कठीण असते, व ती नित्याच्या जीवनातील आवश्यक
गोष्ट आहे.जग खऱ्याखोट्याचे मिश्रण आहे.
श्रीशंकराचार्यांनी अध्यासभाष्यामध्ये ‘सत्यानृते
मिथुनीकृत्य’ असे म्हटले आहे. खरे अणि खोटे नेहमीच
साध्या दृष्टीने कळतेच असे नाही. बऱ्याच वेळा खोटे हे
खऱ्याचे रुप घेऊन येते. त्यासाठी सामन्य दृष्टी
उपयोगाला येत नाही. तेथे विचात, ज्ञान आवश्यक असते.
सूक्ष्म दृष्टीलाच खऱ्या-खोट्याचा भेद कळतो. ती दृष्टी
म्हणजेच विवेक !तो विवेक सर्वांकडे असतोच असे नाही.
ती दृष्टी प्राप्त झाली की पुन्हा दु:खाचा प्रसंग प्राप्त
होत नाही. विवेकाने मनुष्य काम, क्रोध , लोभात अडकत
नाही. योगवसिष्ठात म्हटले आहे,न तदस्ति विमोहाय
यव्दिविक्तस्य चेतस: ।कारण खऱ्याखोट्याचे,
नित्यनित्याचे, योग्य-अयोग्य ज्ञान झाल्यानंतर
खोट्याकडे, अनित्याकडे, अयोग्याकडे मनुष्य प्रवृत्त होत
नाही. पण एवढ्यावरच विवेकाचा विचार संपत नाही.
कारण केवळ खरे-खोटे तथा अर्थाने सर्वच जाणतात. खरे-
खोटे जाणून खऱ्याचा स्वीकार अणि खोट्याचा त्याग
याचे नाव विवेक !हे सर्वांना जमत नाही. दूध पातळ असले
म्हणजे दूधात पाणी आहे हे सर्वजण ओळखतात पण दूध अणि
पाणी वेगळे करुन केवळ दूध ग्रहण मात्र फक्त राजहंसच
असतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलयं,
सलिली पय जैसे । एक होऊनि मिनले असे ।परी निवडुनी राजहंसे । वेगळे किजे ।।


 -  श्रीगुरू चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर 

Thursday 28 January 2016

जर मनुष्याला संगती जडाची, जीवाची असेल तर त्याला बरेचसे दु:खच प्राप्त होते, पण संतांची अणि देवाची संगत घडली तर मात्र त्याला सुख अणि सुखरुपता प्राप्त होते . - श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु  ।।

संत-संग 

मानवी जीवन हे संगप्रधान आहे. प्रत्येकाला कोणाचा
ना कोणाचा संग अपेक्षित आहे. संगरहित जीवनाची
माणूस कल्पनाही करु शकत नाही. एकट्याने राहणे
मानवाला शक्य नाही म्हणून तुरुंगवासाची कल्पना
अस्तित्वात आली.त्या संगासाठी माणूस काय करेल हे
सांगताही येणार नाही. केवळ माणसानेच नव्हे तर
तात्विक दृष्टीने विचार केला तर ब्रह्मालाही एकट्याने
करमले नाही. ‘स एकाकी न रमते’ असे उपनिषिदही म्हणते.
म्हणून ब्रह्मच जगद्रूपाने नटले. म्ह्णजे ब्रह्मालाही
एकट्याला राहणे जमले नाही. म्हणजे प्रत्येकालाच
संगाची अपेक्षा आहे. आपल्यामध्ये जे कमी आहे, त्याची
भरपाई जेथून होते त्याचा संग करणे मानसाला आवडते.मग
तो जीव असो, जड असो, देव असो अथवा संत असो.
त्याची संगत माणसाला घडते अणि त्या सम्गतीवर
त्याचे आयुष्य ठरते. जर संगती जडाची, जीवाची असेल तर
त्याला बरेचसे दु:खच प्राप्त होते, पण संतांची अणि
देवाची संगत घडली तर मात्र त्याला सुख अणि सुखरुपता
प्राप्त होते. मानवाच्या पारमार्थिक जीवनामध्ये
संतसंग हा अत्यंत महत्वाचा अणि आवश्यक मानला आहे.
देवाचा संग जीवला नेहमीच आहे, संतांचा संग मात्र दुर्लभ
आहे.

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर

ह.भ.प.श्रीमंत श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची श्रीक्षेत्र नाशिक येथील किर्तनातील भावमुद्रा !

ह.भ.प.श्रीमंत श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या नाशिक  येथील संत सखाराममहाराज अमळनेरकर स्मृती उत्सवातील  भावमुद्रा !

Tuesday 19 January 2016

ज्ञानेश्वरीचे उपासक सद्गुरू वै.श्री.धुंडामहाराज देगलूरकर ( संक्षिप्त जीवनचरित्र )

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 
सद्गुरू श्री धुंडामहाराज व मातोश्री सौ . कृष्णामाई यांचा २३ वा पुण्यतिथी महोत्सव , पंढरपूर 
( पौष शु.१४ / १५ शनिवार दि.२३ जानेवारी २०१६ ते पौष व.०६ शनिवार दि.२३ जानेवारी २०१६ )
सद्गुरू श्री धुंडामहाराज देगलूरकर यांचे जीवनचरित्र थिंक महाराष्ट्र यावर २९ सप्टेंबर रोजी
मागील वर्षी प्रकाशित करण्यात आले होते , सद्गुरू महाराज यांचा २३ वा .पुण्यतिथी महोत्सव काही दिवसांवर पुढे आहे याचे औचित्य साधून पुन्हा आपल्या पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न .
वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून सद्गुरू वै .धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो.


देगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या घराण्याचे मुळ पुरुष गुंडा महाराज यांचा जन्म १७५३  साली महिपती नाईक आणि भाग्यवती यांच्या पोटी देगलूर येथे झाला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सराफीचा होता. गुंडा महाराजांना बालपणापासून संतसंगाची आवड होती. त्यांनी ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा लाभलेले सिद्धयोगी संत चुडामणी महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. गुंडा महाराजांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तिचा आरंभ देगलूर ते पंढरपूर पदयात्रेने झाला. त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात चक्रिभजन रूढ केले. त्यांचे रसाळ कीर्तन आणि प्रवचन पंढरपूर येथे चातुर्मासात होत असे. त्यामुळे गुंडा महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली. महाराजांचा शिष्यपरिवार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या प्रदेशांत वाढला. औशाचे वीरनाथ महाराज, विजापूरचे  रामचंद्र महाराज तिकोटेकर, तत्त्वज्ञानी बाबा गर्दे, श्रीगोंद्याचे श्रीकृष्णानंद महाराज, कुशतपर्णकर नाथमहाराज इत्यादी श्रेष्ठ मंडळींनी गुंडा महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. गुंडा महाराजांनी पंढरपूर येथे १८१७  साली देह ठेवला. गुंडा महाराजांच्या शिष्यत्वाचा वारसा जोपासणारे देशात पंचवीस मठ अस्तित्वात आहेत.



गुंडा महाराजांचा पारमार्थिक वारसा हरिनाथ महाराजांनी चालवला. हरिनाथ महाराजांनतर गुंडामहाराज (द्वितीय) यांनी मठाची गादी सांभाळली. गुंडा महाराज द्वितीय यांच्या पोटी नारायण, महिपती, लक्ष्मण, रामचंद्र अशी चार मुले जन्माला आली. पैकी रामचंद्र महाराज व मनुबाई या दांपत्याच्या पोटी १९०५  साली (शके १८२६  च्या वैशाख शुद्ध 3, अक्षयतृतीया) धुंडा महाराज यांचा जन्म झाला. महाराज बालपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचा अध्यात्माकडे कल उपजतच होता. धुंडा महाराजांच्या वयाच्या चवथ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले.धुंडा महाराज आणि बंधू बंडा महाराज यांचे पालनपोषण चुलते महिपती महाराज यांनी केले. महाराजांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे रघुनाथराव कोरडे गुरुजींकडे उर्दू आणि मराठी अशा दोन भाषांत झाले. आई मनुबाईच्या मनात तिच्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन वकील व्हावे असे होते. त्यामुळे त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले.
महिपती महाराजांना संत सेवेची आवड असल्यामुळे त्यांच्या मठात अनेक संत महंत, तपस्वी साधक नेहमी येत असत. महिपती महाराजांनी विष्णुबुवा जोग महाराजांना एकदा पंढरपूरच्या मठात बोलावले होते. महिपती महाराज बसलेले असताना बाल धुंडा महाराज त्यांच्या समोर आले. महिपती महाराजांनी जोग महाराजांना, हा त्यांच्या भावाचा मुलगा इंग्रजी शिक्षण घेत असल्याचे सांगताच जोग महाराज म्हणाले, ‘याला इंग्रजी काय शिकवता? संस्कृत शिकवा ना!’ धुंडा महाराजांना उद्देशून जोग महाराज म्हणाले, ‘तुला वकील, डॉक्टर कशाला व्हायचे? तू संतकुळात जन्मलास, संस्कृत शीक, तुमच्या घरी ज्ञानेश्वरीची उपासना आहे. चांगली ज्ञानेश्वरी सांग’. जोग महाराजांच्या उपदेशाने धुंडा महाराजांच्या जीवनाला कलाटणी  मिळाली.
धुंडा महाराजांच्या आईचाही त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यू झाला. पोरकेपणाचे दु:ख पदरी आले. धुंडा महाराज जोग महाराजांची आज्ञा प्रमाण मानून त्यांच्या घराण्याच्या संतपरंपरेचा वारसा चालवण्यासाठी शालेय शिक्षण सोडून पारमार्थिक अध्ययनाकडे वळले. महाराजांचे प्रारंभिक संगीत शिक्षण देगलूरच्या मठात पं.विनायकबुवा गवई यांच्याकडे  झाले. देवणी येथील विख्यात वेदांत पंडित शा.सं. दामोदरशास्त्री यांनी देगलूरच्या मठात राहून महाराजांना संस्कृत काव्य, व्याकरण आणि त्यातील तत्त्वज्ञान शिकवले. पुढे, धुंडा महाराज वेदांताकडे वळले आणि त्यांनी वेदांताचा सखोल अभ्यास केला. विविध संस्कृत ग्रंथांचे सूक्ष्मपणे वाचन करून सखोल चिंतन केले. महाराजांना अफाट आणि अलौकिक स्मरणशक्तीची दैवी देणगी लाभली होती. पुढे, त्यांनी पंढरपूर येथील अखिल भारतीय कीर्तीचे भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे न्यायशास्त्र, तर्कसंग्रहदीपिका, वेदांतपरिभाषा, पंचदशी, गीताभाष्य, ब्रह्मसूत्र, उपनिषदादी ग्रंथांचा अभ्यास केला. धुंडा महाराजांनी ‘भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी | कृपा हरि तयावरी’ हा संत एकनाथांचा संदेश उरी बाळगून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी श्रद्धेने, निष्ठेने देगलूरजवळील रामपूर या शिवतीर्थी ज्ञानेश्वरीची एकशेआठ पारायणे केली. त्याच दरम्यान अग्रहारचे वकील मल्हारराव यांची कन्या कृष्णाबाई यांच्यासोबत धुंडा महाराजांचा विवाह झाला.
धुंडा महाराजांनी त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी देगलूर ते पंढरपूर आषाढी पदयात्रेला आरंभ करून दिला. पुढे, यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी पंढरपूर वारी पासष्टाव्या वर्षांपर्यंत निष्ठेने चालू ठेवली. महाराज चातुर्मासात चार महिने पंढरपुरी विठुरायाच्या दरबारात व्रतस्थपणे सेवा करत असत. देगलूर संस्थानाला तेलंगणातील मोघ्यांची जहागिरी होती. नारायण महाराजांचे निर्वाण शके १९२५ मध्ये झाल्यानंतर निजाम सरकारकडून महिन्याच्या आत वारसा हक्काची नोंद करण्याचा आदेश आला. महिन्याच्या आत वारसाचे नाव नाही लागले तर जहागिरी जप्त करण्यात येईल असे कळवण्यात आले होते. तेव्हा महिपती महाराजांनी धुंडा महाराजांना हैदराबादला जाण्यास सुचवले. धुंडा महाराज त्यांना म्हणाले, ‘देवसेवा ही आपली खरी जहागिरी आहे, पूर्वजांनी ती सांभाळली. आपल्याला तीच वर्धिष्णू केली पाहिजे. लौकिक जहागिरीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. शिवाय, जे आपले असेल ते कशानेही जाणार नाही आणि जाणारच असेल तर ते प्रयत्नानेदेखील मिळणार नाही.’ पण महाराजांचा तो विचार अनेकांना अव्यवहार्य वाटला. धुंडा महाराज चातुर्मास संपल्यानंतर, विठुमाऊलीचे दर्शन घेऊन हैदराबादला गेले. महाराजांनी निजाम सरकारला भेटीसाठी वेळ मागितला. त्यांना उलट निरोप मिळाला, की ‘जप्त केलेली जहागिरी परत मिळणार नाही. म्हणून भेटण्याचे कारण नाही.’ त्यावर महाराजांनी निरोप पाठवला, की ‘मी तुम्हास भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे. जहागिरी परत मिळवण्यासाठी नव्हे.’ परवानगी मिळाली. महाराज निजामाला नम्रपणे म्हणाले, की तुम्ही आमची जहागिरी जप्त केली आहे.  ती तुम्हीच दिली होती. आमच्या कुळाने त्या जहागिरीचा सुमारे सव्वाशे वर्षं उपभोग घेतला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे. पण तुम्ही जी जहागिरी दिली त्या दानपत्रातच तुम्ही आम्हाला चातुर्मासात पंढरपूर येथे राहून धर्मसेवा करण्याची आज्ञा दिली आहे. आम्ही आज्ञेचे पालन केले. तुम्ही बोलावले असताही आम्ही चातुर्मासात आलो नाही. हे तुमच्या आज्ञेचे उल्लंघन नाही, तर तुमच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञेचे परिपालन आहे. निजाम क्षणभर भांबावला! त्याने दप्तरातील कागदपत्रांतून महाराजांच्या बोलण्यातील सत्यता पडताळून पाहिली व म्हणाला, ‘आम्ही तुम्हाला तुमची जहागिरी परत देत आहोत. आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.’ धुंडा महाराजांनी निजामाला जिंकले! मात्र त्यांनी ते कुठल्या चमत्काराच्या बळावर साध्य केले नाही; तर त्यांनी निजामाला विवेक आणि सौजन्यशीलता यांच्या बळावर जिंकले.
धुंडा महाराजांनी चातुर्मासात पंढरपूर सोडायचे नाही हे व्रत आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळले. त्यातून त्यांची त्यांच्या परमार्थावरची निष्ठा लक्षात येते. चातुर्मासाच्या काळात महाराजांच्या जीवनात एकापेक्षा एक भयंकर असे कसोटीचे प्रसंग आले. महाराजांनी त्यांची चित्तवृत्ती त्यांच्या जीवनात डोंगराएवढे दु:ख येऊनही ढळू दिली नाही. महाराजांचा मोठा मुलगा वसंत पुण्यातील महाविद्यालयात शिकत होता. तो दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे हैदराबादला गेल्यानंतर मोटार अपघातात दगावला. तेव्हा चातुर्मास चालू असल्याने महाराज पंढरपूरला होते. महाराजांचे प्रवचन चालू असताना त्यांच्या हातात मुलाच्या मृत्यूची तार देण्यात आली. महाराजांनी तार वाचली आणि शांतपणे ती तार तशीच ठेवून त्यांचे प्रवचन पूर्ण केले. महाराजांनी ती बातमी इतरांना प्रवचन संपल्यानंतर सांगितली. तेव्हा सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसला. महाराजांच्या संबंधातले लोक सांत्वन करण्यास आले तेव्हा महाराज म्हणाले, ‘ऋणानुबंध संपला आणि तो गेला. तिकिट संपले की गाडीतून उतरावेच लागते.’ महाराजांनी त्यांचा तोल, संयम आणि विवेक तशा दु:खद प्रसंगीही ढासळू दिला नाही.
चातुर्मासात पंढरपुरी संतांची मादियाळी असे. त्या काळात ह.भ.प. विनायकबुवा साखरे, बंकटस्वामी, सोनोपंत दांडेकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, केशवमहाराज देशमुख इत्यादी विद्वानांचे अभ्यासपूर्ण कीर्तन आणि प्रवचने धुंडा महाराज जिज्ञासेने विनम्रतापूर्वक श्रवण करत. चातुर्मासात चार महिने पंढरपूर क्षेत्री कीर्तन आणि प्रवचन सेवा करण्याबरोबरच जिज्ञासू अभ्यासकांसाठी वेद, शास्त्र, गीता, भागवतादी ग्रंथांवर पाठ देत असत. महाराजांच्या पाठास संपूर्ण देशातून आलेले तीनशे-चारशे जिज्ञासू अभ्यासक विद्यार्थी उपस्थित राहत. महाराजांच्या अल्पावधीतील व्यासंगाचे भारतातील तत्कालीन विख्यात पंडित ब्रह्मलीन लक्ष्मणशास्त्री द्रवीड यांनी तोंड भरून कौतुक केले होते. देशाला अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या पंढरपूर विद्यापीठाचे धुंडा महाराज देगलूरकर आजीवन कुलपतीच बनून गेले होते!
‘पाहूनिया ग्रंथ करावे कीर्तन’ हा तुकोबांचा विचार उरी बाळगून, महाराज वयाच्या विसाव्या वर्षापासून नित्य अभ्यासपूर्ण कीर्तन, प्रवचन करू लागले. अफाट वाचन आणि चिंतन यांमुळे वयाच्या विसाव्या-एकविसाव्या वर्षी महाराजांच्या वाणीला ओज प्राप्त झाले. कीर्तनाचा चाहतावर्ग उत्तरोत्तर वाढू लागला. महाराजांच्या वाणीला दैवी माधुर्य होते. वाचन, पाठांतर, चिंतन आणि मनन यांमुळे त्यांच्या वाणीचा गोडवा जनसागराला आकर्षित करत असे. त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून ‘वक्ता दशसहस्रेषु |’ या उक्तीचा प्रत्यय श्रोत्यांना येई. महाराज त्यांच्या प्रवचनांतून ज्ञानेश्वरीप्रमाणेच अमृतानुभवासारख्या श्रेष्ठ समस्येच्या सिद्धांताची उकल लीलया करत. अवघड, गूढ तत्त्वज्ञान सुगमतेने सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता. महाराजांचे कीर्तन-प्रवचन अखंडितपणे चालत असे. चातुर्मासाचे चार महिने वगळता महाराज आठ महिने कीर्तन-प्रवचनार्थ संपूर्ण महाराष्ट्र संचार करत असत. महाराष्ट्रातील कोणताही मोठा नाम सप्ताह महाराजांच्या कीर्तन-प्रवचनाशिवाय संपन्न होत नसे. महाराजांनी हृदयविकाराचे दोनदा झटके येऊनही त्यांचे कीर्तन, प्रवचन आणि प्रवास थांबवला नाही. त्यांनी दळणवळणाची साधने फारशी नसूनही बस-रेल्वेने प्रवास केले. त्यांनी ग्रामीण भागात कीर्तन-प्रवचनाला जाण्यासाठी प्रसंगी बैलगाडीतून तर काही वेळा पायीही प्रवास केला. उतारवयात एवढी दगदग कशासाठी? असा सवाल कुणी केल्यास महाराज म्हणत, ‘श्रोते प्रवचनाला येतात, मी त्यांना बघतो, मला आनंद होतो, धन्यता वाटते, की हजारो डोळयांनी माऊली माझ्याकडे बघत आहे व माझे ऐकत आहे.’ त्यांची कीर्तन-प्रवचनावरील निष्ठा अशी होती. महाराजांचे जीवन म्हणजे अखंड ज्ञानयज्ञच! धुंडा महाराजांच्या रसाळ, अमोघ वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यांची महाराष्ट्राबाहेर मद्रास, मच्छलीपट्टण, हैदराबाद, बडोदा, इंदूर, काशी, कोलकाता इत्यादी ठिकाणी मराठी, हिंदी व काही वेळा तेलगुतूनही प्रवचने झाली. प्रकृती चांगली नसताना कुणी ‘कीर्तन करू नका’ असा सल्ला दिला तर महाराज म्हणत, ‘ज्ञानेश्वरी नाही ते जगणे काय?’ त्यांचे अवघे जीवन ज्ञानेश्वरीमय झाले होते.
नाशिकचे कीर्तन संमेलन, पुण्याचे व गोव्याचे कीर्तन संमेलन, नारदीय कीर्तनकार शिबिर अशा ठिकाणी महाराजांची प्रमुख उपस्थिती असे. तो उपस्थित कीर्तनकारांसाठी सुवर्णयोगच ठरत असे. महाराज जणू कीर्तनकारांचे दीपस्तंभ होते. गोव्याच्या कीर्तन संमेलनाचे संयोजक चारशे कीर्तनकारांच्या वतीने धुंडा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, ‘या गौरीशंकर शिखरापुढे आम्ही सारे कीर्तनकार ठेंगणे आहोत याची प्रचीती आली.’ वारकरी संप्रदायाचे विचार रुजवण्यासाठी विसाव्या शतकात धुंडा महाराज आणि प्राचार्य मामा दांडेकर यांनी संपूर्ण भारतभर अव्याहतपणे संचार केला.
धुंडा महाराज स्वत: ज्ञानेश्वरी जगले. ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी’ या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरीतील अद्वैत विचार महाराजांच्या आचरणात होता. महाराजांचे एकुलते एक सख्खे बंधु श्री बंडामहाराज  देगलूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने १९६१ साली अकस्मात मृत्यू झाला. त्याआधी काही वर्षे त्यांचा थोरला मुलगा देवाघरी गेला होता. एकापाठोपाठ एक महाराजांवर दु:खद प्रसंग आले होते. पुण्याहून मामा दांडेकर धुंडा महाराजांचे सांत्वन करण्यासाठी देगलूरला आले होते. त्याच दरम्यान पुण्याला पानशेतचा प्रलय येऊन गेला होता. मामांचे पूरग्रस्तांना मदतकार्य चालू होते. तशा प्रसंगी, भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही धुंडा महाराजांनी मामांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाचशे रूपयाचा चेक दिला. तेव्हा मामा आश्चर्याने म्हणाले, की अशा समयी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. महाराज म्हणाले, कर्तव्याला कधीही पारखे होता यायचे नाही. नंतर मामांचे पत्र आले, त्या पत्रात मामांनी लिहिले, ‘एवढ्या दु:खातही आपण मदत केली. परमार्थ पचवल्याशिवाय मनाची अशी स्थिती होत नाही.’
रझाकारांनी निजामी राज्यात हिंदूंचा अनन्वित छळ चालू केला होता. तेव्हा निजामी राज्यातील बरीच मंडळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी पंढरपूरकडे धाव घेऊ लागली. महाराजांनी त्या सर्व लोकांची राहण्याची व जेवणाची सोय त्यांच्या मठात केली. ते त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
पारायण, चिंतन, मनन, प्रबोधन, प्रवचन, कीर्तन, वारी, चातुर्मास आणि प्रवास म्हणजेच महाराजांचे जीवन होते. त्याकाळी पंढरपुरात पाठप्रबोधनाबाबत महाराजांची ख्याती होती. एकदा जोग महाराजांचे शिष्य शांताराम गुरुजींनी धुंडा महाराजांकडे सिद्धांत ग्रंथ समजावून सांगण्याचा आग्रह धरला. तेव्हा वेळ नसल्यामुळे त्यांना महाराजांनी प्रवासाला सोबत चलण्यास सुचवले. शांताराम गुरुजी धुंडा महाराजांसोबत बैलगाडीतून प्रवासाला निघाले. धुंडा महाराज शांताराम गुरुजींना सिद्धांत समजावून सांगत होते, तेवढयात बैलगाडी कलंडली. सर्वच खाली पडले. महाराजांच्या पायावरून चाक गेले. शांताराम गुरुजींनाही लागले होते. गाडीतून खाली पडल्यावर अचानक महाराज व शांताराम गुरुजी एकमेकांसमोर आले तेव्हा महाराजांनी विचारले, शांताराम, कोणता विषय चालू होता? क्षणाचाही विलंब न लावता महाराजांनी त्यांचा पाठ पुढे सुरू केला. शांताराम गुरुजींना धडा मिळाला! 
धुंडा महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर असंख्य प्रवचने दिली. त्यांनी हरिपाठाच्या सातत्यपूर्ण चिंतनातून सहाशे पानांचा प्रदीर्घ स्वरूपाचा ‘हरिपाठविवरण अथवा भक्तिशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. मामा दांडेकरांनी त्यांच्या प्रस्तावनेतून त्या ग्रंथातून महाराजांच्या अथांग व्यासंगाचे दर्शन घडत असल्याचे सांगितले आहे. हरिपाठातील नाममहात्म्य आणि तत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. संत एकनाथांच्या हरिपाठावरही सुमारे दोनशे पानांचे भाष्य पुढे, १९७४  च्या सुमारास लिहून हरिपाठाचा वस्तुक्रियापाठच भाविकांच्या हाती दिला. धुंडा महाराज देगलूरकरांनी महर्षी नारदांच्या ‘भक्तिसूत्रा’वर चारशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. भक्तिशास्त्रावरील मौलिक ग्रंथ म्हणून ‘नारदभक्तिसूत्र’ या ग्रंथाची ख्याती सर्वदूर पसरली. त्यानंतर त्यांनी दीडशे पानांचा ‘संतवचनामृत’ हा ग्रंथ लिहिला. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या दहा अभंगांवरील संकीर्तन आहे. ‘तो ग्रंथ म्हणजे भक्तिप्रेमानंद चाखणाऱ्या विद्वान पंडितांना मेजवानीच आहे’ असा अभिप्राय मामा दांडेकरांनी व्यक्त केला. त्याबरोबर महाराजांचे तुकारामांच्या अभंगावरील निरूपणाचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी १९७६  साली सोलापूर येथील ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दीनिमित्त ‘पसायदान - संत ज्ञानेश्वरांचे मागणे’ या ग्रंथाचे लेखन केले. पसायदानातील केवळ नऊ ओव्यांवर त्या ग्रंथात धुंडा महाराजांनी अडीचशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. त्यातून महाराजांच्या चिंतनाची सखोलता लक्षात येते. ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते झाले. त्यांनी त्या ग्रंथाचे तोंड भरून कौतुक केले. पुढे, आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टण येथे आंध्र भाषातज्ज्ञांच्या मदतीने तेलुगू भाषेत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन केले. त्या ग्रंथलेखनाबरोबरच मुमुक्षू, प्रतिष्ठान, पुरुषार्थ, प्रसाद, तत्त्वज्ञान, माऊली, यज्ञवाक्य, जीवनविकास, श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ, सांगाति, कल्याण, पंढरी संदेश, पंचधारा इत्यादी मासिक-पाक्षिक-नियतकालिकांतून महाराजांनी प्रसंगानुरूप संत साहित्यावर लेखन केले. महाराजांनी शेकडो ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेल्या आहेत.
विदर्भ साहित्य संघ, लातूर साहित्य परिषद, कऱ्हाडचे साहित्य संमेलन, वैदिक परिषद, संस्कृत संमेलन, यक्षादि कार्यक्रम पुणे आणि नाशिक येथील वसंत व्याख्यानमाला अशा विविध ठिकाणी धुंडा महाराजांची विचारप्रवर्तक व्याख्याने झाली. त्यांनी प्रयाग येथे १९६६  साली झालेल्या विश्व हिंदू परिषदेस उपस्थित राहून ‘जीवनात धर्माचे स्थान’ या विषयावर हिंदीतून अस्खलीत भाषण दिले. परिषदेतील देशविदेशातील संतमहंत महाराजांचे व्याख्यान ऐकून अचंबित झाले. विश्व हिंदू परिषदेचे भव्य अधिवेशन आळंदी येथे १९८७ च्या अखेरीस झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद श्री धुंडा महाराजांना देण्यात आले होते. महाराजांनी त्यांची शारीरिक अवस्था चांगली नसूनही ओजस्वी स्वरूपाचे अध्यक्षीय भाषण केले. त्याशिवाय अनेकांचा सत्कार समारंभ, एकसष्टी, अमृत महोत्सवानिमित्त झालेली महाराजांची भाषणे अविस्मरणीय ठरली. एकंदर महाराजांच्या बोलण्यात, वागण्यात, लेखनात आणि कृतीत सहजता, समयज्ञता, संयमशीलता आणि सहिष्णुता यांचे दर्शन घडते.
धुंडा महाराज म्हणजे जणू फिरता ज्ञानकोश होते. विजया संगवई यांनी महाराजांना एका मुलाखतीत ‘तुमची विद्वत्ता पाहून विद्यापीठाने सेवेची संधी दिली तर स्वीकाराल का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा महाराजांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, “माझे कार्यक्षेत्र वेगळे आणि विद्यापीठाचे कार्यक्षेत्र वेगळे. मी सांप्रदायिक आहे. त्या संप्रदायाच्या निष्ठा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेऊन माझे विचार मांडणे किंवा ज्या विषयाचा माझा थोडाफार अभ्यास आहे त्यावर एखादे व्याख्यान देणे वेगळे आणि विद्यापीठाच्या क्षेत्राशी बांधून घेणे वेगळे... पुन्हा विद्यापीठाचे कार्य बौद्धिक स्तरावर चालते. मी बौद्धिक स्तराबरोबरच भावनिक स्तराला महत्त्व देतो. त्याद्वारेच माणसाच्या वृत्तीत काही चांगले परिवर्तन होणे शक्य असते व असे कार्य व्यक्तिगत स्तरावरून अधिक चांगले होत असते असा माझा विश्वास आहे. या कार्याचे लोकांना एवढे महत्त्व वाटते, की त्यासाठी आमच्या प्रपंचाचा भार ते आमच्या शिरावर राहू देत नाहीत! इतके लोकांचे अफाट प्रेम मला लाभले आहे. त्यांच्या प्रेमाने माझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. असे असल्यामुळे तुम्ही म्हणता तशी संधी आलीच तर ती मी बहुधा स्वीकारणार नाही... पुन्हा माझे स्वत:चेच एक स्वतंत्र विद्यापीठ बनून गेले आहे. ज्ञानोबा- तुकोबांनी स्थापलेले. ते जंगम विद्यापीठ आहे! मी त्या विद्यापीठाच्या सेवेत आधीच आहे. त्या सेवेतून रिटायर होता येत नाही.” धुंडा महाराजांना एकसष्टावे वर्ष लागल्यानंतर त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्नेही मंडळींनी १९६६  साली घाट घातला. महाराजांनी आरंभी त्यास नकार दिला, पण मामा दांडेकरांनी त्या बेतास ‘ज्ञानेश्वरी सेवा गौरवा’चे रूप दिले. त्यावेळी महाराज नम्रपणे म्हणाले,

  ‘धोंडयावर सोन्याचे दडपण आले!’ तो गौरव सोहळा म्हणजे अविस्मरणीय असा कीर्तन आणि प्रवचन महोत्सवच घडून आला. अनेक थोर कीर्तनकारांची कीर्तने आणि प्रवचने झाली. स्वत: महाराजांनीहीकैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||’ या अभंगावर दोन दिवस रसाळ असे कीर्तन केले. त्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरूजी यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार झाला. समारंभाचे प्रमुख मामा दांडेकर होते. महाराजांनी त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना देहात प्राण असेपर्यंत ज्ञानेश्वरीसाठीच झिजणार असल्याचे सांगितले. मग एकसष्टीनिमित्त चाळीसगाव, बडोदा, नाशिक, देगलूर अशा अनेक ठिकाणी महाराजांच्या सत्काराची रांगच लागली आणि त्यांना ना म्हणणे शक्य राहिले नाही.
महाराजांना पंच्याहत्तर वर्षे १९८०  साली पूर्ण झाली. त्या निमित्त पंढरपूर येथे भव्य नामसप्ताह आयोजित करण्याचे ठरले. नामसप्ताह श्री गजानन महाराज संस्थानच्या मंदिर प्रांगणात ०८ ते १५ नोव्हेंबर (१९८० ) असा साजरा झाला. त्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन-प्रवचने झाली. महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त दैनिक सोलापूर संचार या वृत्तपत्राने विशेषांक काढून कृतज्ञता व्यक्त केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार १४  नोव्हेंबर १९८०  रोजी करण्यात आला. त्यांना एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची गुरुदक्षिणा समर्पित करण्यात आली. अमृतमहोत्सवी नामसप्ताहाच्या समारोपाचे भाषण करताना ज्ञानेश्वर माऊली असा शब्द उच्चारताच त्यांना गहिवरून आले. त्या भाषणात वारकऱ्यांनी दिलेल्या दक्षिणेतून वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षासाठी धार्मिक ट्रस्ट उभा करण्याचे घोषित केले. समाजाने दिलेला पैसा महाराजांनी समाजासाठीच आर्पित केला.
धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला. महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेथे जाऊ शकले नाहीत. तेव्हा पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते, पुणे विद्यापीठातील ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. वि.रा.करंदीकर, नामदेव अध्यासनाचे प्रमुख अशोक कामत स्वत: पंढरपूर येथे गेले. कुलगुरूंच्या हस्ते महाराजांचा हृद्य सत्कार झाला. त्या प्रसंगी किसनमहाराज साखरे उपस्थित होते. वयोमानानुसार भाषण करण्याचे अवसान नसूनही महाराजांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. महाराज म्हणाले, “विद्यावंतांच्या नगरीतल्या विद्यापीठाने माझा सन्मान केला तो यासाठी की मी गेली सत्तर-बहात्तर वर्षं  ज्ञानेश्वरीची प्रवचने करतो. जनजागरण करतो. पण खरे सांगू का? मी जी ज्ञानेश्वरी सांगतो ती मला कळली म्हणून सांगत नाही, तर स्वत:ला ज्ञानेश्वरी कळावी म्हणून सांगत राहिलो. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी जशी मला ती कळू दिली तशी मी ती सांगितली. ‘बोलविले बोल ज्ञानदेवे |’ यात माझे कर्तृत्व काय! तरी मोठ्या मनाच्या पुणे विद्यापीठाने माझा गौरव केला.” महाराजांच्या हृदयात ज्ञानेश्वरी रुजली आहे, म्हणून अशी नम्रता आणि विवेक अंगी आला आहे अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केली.
पुणे येथील पेशवे सरकारने स्थापन केलेल्या देवदेवेश्वर मंदिर (पुणे) तर्फे धुंडा महाराजांचा १९८७  साली मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. समारंभ भारतीय संस्कृती कोशकार महादेवशास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी त्यांच्या मनोगतातून ‘नरामाजी राजा धुंडीराजा !’ अशा शब्दांत महाराजांचा गौरव केला.
पंढरपूर नगरपालिकेने फेब्रुवारी १९९१  मध्ये महाराजांचा भव्य सत्कार करून त्यांना मानपत्र दिले. त्या कार्यक्रमास महाराजांचे स्नेही पांडुरंगशास्त्री आठवले व महाराजांचे सुहृद अनंत महाराज आठवले उपस्थित होते.
विदर्भातील श्री जिजाऊ प्रतिष्ठान या शिवरायांच्या मातेच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्य करत असलेल्या संस्थेने आळंदीक्षेत्री महाराजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याप्रसंगी धुंडा महाराजांना जे मानधन देण्यात आले ते त्यांनी जिजाऊ मातेच्या चरणी समर्पित केले.
आळंदी येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान कडून महाराजांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. महाराजांची विद्वत्ता आणि वक्तृत्व यांची ख्याती ऐकून कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य जगदगुरू चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे पंढरपूर येथे धुंडा महाराजांच्या भेटीस मठात आले.
मराठी साहित्य परिषद, आंध्रपदेशच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘पंचधारा’ त्रैमासिकाने धुंडा महाराजांवर स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केला. याशिवाय ‘पंढरी संदेश’ या नियतकालिकानेही धुंडा महाराजांवर विशेषांक संपादित केले.
महाराजांचे फिरणे १९८६  पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंद झाले, पण त्यांनी ज्ञानेश्वरीच्या चिंतनात, अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. महाराजांनी रात्र रात्र जागून निरूपणात्मक ज्ञानेश्वरीचे लेखन त्याच काळात केले. महाराजांना पुढे, १९८९  च्या अखेरीस बोलण्याचाही त्रास होऊ लागला. लेखन मंदावले. शरीर क्षीण होत गेले. तब्येत खालावली. महाराजांची प्राणज्योत पौष वद्य पंचमी, शके १९१४  (२३  जानेवारी १९९२  रोजी) सायंकाळी मालवली. त्यांच्या धर्मपत्नी कृष्णामाँ यांचा त्यानंतर काही तासांनी मृत्यू झाला त्यांनी हि वैकुंठाला प्रस्थान ठेवले . ती दोघे जोडीनेच आयुष्यभर सफल प्रपंच आणि परमार्थ करून कैवल्याचा राणा पांडुरंगाकडे परमशांतीसाठी गेली. ती महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय आणि अपूर्व अशी घटना होय.

-    ( साभार :डॉ. रवींद्र वैजनाथराव बेम्‍बरे,  थिंक महाराष्ट्र )


( सद्गुरू ह.भ.प.धुंडामहाराज  देगलूरकर यांची ज्ञानपरंपरा त्यांचे चिरंजीव पु. ह.भ.प.भानुदासमहाराज यांनी  अविरत  सांभाळली . मागील वर्षी पूज्य श्रीगुरू ह.भ.प.भानुदासमहाराज  उर्फ पु. दादांनी आषाढ कृ .१४ गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०१५ रोजी गुरुपुष्यामृतयोगावर इहलोकाची यात्रा पूर्ण केली . हीच अखंड ज्ञान परंपरा श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज सांभाळत आहेत .  मागील वर्षी वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र संचलित  मासिक वैष्णव दर्शन तर्फे ह.भ.प.सद्गुरू धुंडामहाराज देगलूरकर यांच्या सबंध जीवनप्रवासावर विशेष असा"सद्गुरू अंक " वा.न.उत्पात शास्त्री यांच्याहस्ते  श्रीगुरु पु.भानुदासमहाराज , श्रीगुरू चैतन्यमहाराज , श्रीगुरू प्रमोदमहाराज यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला होता . पूज्य सद्गुरू भानुदासमहाराज  यांच्या वैकुंठगमना नंतर पु.दादांच्या स्मृती प्रीत्यर्थ मासिक वैष्णव दर्शन तर्फे डिसेंबर २०१५ चा अंक सद्गुरू महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारा होता , सदर अंकाचे प्रकाशन श्रीगुरू पु. चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते खारघर येथे संपन्न झाले .) 





दोन्ही अंकांच्या pdf फाईल उपलब्ध आहे . 









भव्य तुळशी अर्चन सोहळा , मुक्ताईनगर येथे संपन्न !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 

श्री संत मुक्ताई संस्थान आयोजित भव्य तुळशी अर्चन सोहळा , मुक्ताईनगर 

मा.रविंद्रजी पाटील (अध्यक्ष - श्री संत मुक्ताई संस्थान ) यांच्या शुभहस्ते ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांस संत मुक्ताई यांचे आशीर्वाद प्राप्त

संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान , त्र्यंबकेश्वर तर्फे आशीर्वादरुपी सन्मान !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित, वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त तथा संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वर यांचे अध्यक्ष मा.ह.भ.प.त्र्यंबकराव गायकवाड , कीर्तनकेसरी श्रद्धेय गु. संजयमहाराज धोंडगे ( विश्वस्त - संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वर ) यांच्या शुभहस्ते येवल्याचा प्रसिद्ध असणारा रेशमी फेटा देऊन सन्मान करण्यात आला , ह्याला सन्मान म्हण इतकस मनाला रुचत नाही . माझ्याकरिता हा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा भेटलेला आशीर्वादरुपी प्रसाद आहे . समवेत मा. विनीतजी सबनीस ( अध्यक्ष - श्रीमंत माउली प्रतिष्ठान , मुंबई )

Thursday 14 January 2016

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशिष्ट दिवशी साजरे केले
जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध
प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन
शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते.
पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात
दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो
पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी
आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, "तिळगूळ घ्या आणि
गोड बोला." एकमेकात सौख्य, स्नेह वाढविणारा हा गोड सण.
आता तुकाराम महाराज या सणाचे वर्णन कसे करतात पाहा -
देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥
तिळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तिचे प्रतिक मानले आहे. तो स्निग्ध आहे.
’देव तिळीं आला’ म्हणजे देव आमच्या प्रेमात आला. आमच्या भक्तिच्या
अधिन झाला. याचा परिणाम काय झाला? ’गोडें गोड जीव धाला.’
यामुळे मुळचाच गोड-सुखरुप असलेला जीव देवाच्या गोडीने-सुखाने
तॄप्त झाला.
मराठी भाषा मोठी गमतीदार आहे.
’गोड’ ही एक रुचि आहे. पण गोड हा शब्द आपण कसा कसा वापरतो
पाहा.
’जेवण मोठे गोड होते हो.’ जेवणात भात, आमटी, पापड, चटणी,
भजी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ होते. प्रत्येकाची चव वेगळी पण
आपण म्हणतो जेवण मोठे गोड होते.
एखादे छोटे बाळ पाहून आपण म्हणतो ’किती गोड बाळ आहे.’
एखाद्या सुंदर युवतीचा चेहरा पाहून म्हणतो ’किती गोड मुलगी आहे.’
लताचे गाणे ऐकून म्हणतो ’किती गोड गळा आहे.’
आपण गोड खातो तसे गोड बोलावेही. कारण शब्द गोड असतात तसे
कटूही असतात. शब्द मॄदु असतात तसे कठीणही असतात.
ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत -’शब्द जैसे कल्लोळ अमॄताचे’
अमॄतासारखे गोड शब्द.
आपण असेही म्हणतो ’आजचा दिवस मोठा गोड झाला.’
किंवा असेही म्हणतो ’थोडे भांडण झाले खरे पण शेवट अखेर
गोड झाला.
देवाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
गोड तुझे रुप गोड तुझे नाम ।
नामदेवराय देवाच्या नामाचे वर्णन करतात-
अमॄताहूनी गोड नाम तुझे देवा ।
अर्थात गोड म्हणजे चांगले, सुंदर, सुखकारक, आनंद देणारे.
संतांनी ’बरवा’ हा शब्दही याच अर्थाने वापरला आहे.
नामदेवरायांचा हा गोड अभंग पाहा -
नाम बरवे रुप बरवे । दरुशन बरवे कानडीयाचे ॥
नामा म्हणे तुझे अवघेची बरवे । त्याहूनी बरवे प्रेम तुझे ॥
असा देव बरवा आहे, सुंदर आहे, गोड आहे, सुखरुप आहे,
आनंदघन आहे.
म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात-
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥
तुकाराम महाराज तर विचारतात -
सुखरुप ऐसे दुजे कोण सांगा । माझ्या पांडुरंगावाचोनी ते ॥
परमात्मा सुखरुप आहे म्हणजेच गोड आहे. जीव हा मूळात परमात्म
स्वरुपच असल्याने गोडच आहे. जीव आणि देव मुळात भिन्न नाहितच.
देवच जीवभाव धारण करुन स्वत:च भक्त झाला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात -
देव भक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ।
जड जीवां उद्धार व्हावया लागोनि । शरण तुका वंदीं पाउलें दोन्ही ॥
भक्तीचा खेळ करण्यासाठी देव आणि भक्त हे काल्पनिक द्वंद्व कल्पिले.
पण भक्तित अखेर देव आणि भक्त वेगळे राहत नाहित.
देव आणि भक्त । नाही दुजा विचार ॥
देव पहायला गेलेला भक्त हा देवच होतो. तुकाराम महाराज म्हणतात-
देव पहावया गेलो । तेथे देवची होवूनी ठेलो ।
अशाप्रकारे मुळच्या गोड असलेल्या जीवाला देवाची गोडी प्राप्त झाली.
तो तॄप्त झाला.
मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे पूण्यकाळ मानला आहे. पर्वकाळात
तिर्थात स्नान करावे असा संकेत आहे. तिर्थात स्नान केल्याने पापनाश
होतो असाही संकेत आहे.
देव तिळी आल्याने हा पर्वकाळ साधला गेला असे तुकाराम महाराज
पुढे वर्णन करतात.
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
हा पर्वकाळ साधला गेल्याने माझ्या अंत:करणातील मळ हा दोष
नाहिसा झाला असे तुकाराम महाराज म्हणतात.
आपल्या चित्तातील पाप वासना म्हणजेच मळ हा दोष होय. ही पाप
वासना संपूर्ण नष्ट करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात्मक भक्तित आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥
भक्तिमार्गात संत महात्म्यानी नाम संकीर्तनाने सर्व पाप कसे नाहिसे
केले आहे याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत आले आहे ते असे -
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
मनातील पाप वासना पूर्ण नष्ट व्हायची असेल तर तिचे मूळाशी
असलेले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा विकारही
नाहिसे व्हायला हवेत. हे विकार मोठे प्रबळ आहेत. उदाहरणार्थ
काम आणि क्रोध या प्रबळ विकारांचे वर्णन करताना माऊली म्हणतात-
हे विषय दरिचे वाघ । ज्ञाननिधीचे भुजंग ।
भजन मार्गीचे मांग । मारक जे ॥
आपल्या तप सामर्थ्याने भर माध्यानीचा सूर्य जो झाकू शकतो तो
वेदज्ञ तपस्वी पराशर काम वासनेवर विजय मिळवू शकत नाही.
ज्ञानी राजा परिक्षितीला क्रोधावर विजय मिळवता न आल्याने
मॄत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते.
तुकाराम महाराज म्हणतात -
संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होता दिगांबर निस्पॄही वैराग्यकारी ।
कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरी न सुटती ॥
या कामक्रोधादी विकारांचा नाशही नामस्मरणाने होतो.
तुकाराम महाराज म्हणतात -
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥
तुकाराम महाराजांना मंबाजीने ऊसाने बडवले तरी महाराजांना क्रोध
आला नाही. महाराजांची परिक्षा पहाण्यासाठी काही कुटाळांनी एका
सुंदर वेश्येला महाराजांकडे पाठविले. तीने महाराजांचे मन जिंकण्याचे
खूप प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. उलट तिला वंदन करून
महाराज म्हणाले -
जाई वो तू माये न करि सायास । आम्ही विष्णूदास तैसें नव्हे ॥
कारण तुकाराम महाराजांच्या तिळी देव आला होता. तुकाराम महाराज
म्हणतात -
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले । कामक्रोधें केले घर रिते ॥
भक्तिगंगेतील या स्नानाचे वर्णन महाराज पुढे करतात -
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
भक्तिगंगेतील या एकाच स्नानाने संचित पाप-पुण्ये नष्ट झाली
आणि क्रियमाण पाप-पुण्ये खुंटली म्हणजे लागेनाशी झाली आहेत,
असे तुकाराम महाराज म्हणतात.
प्रारब्धाचा भोग कुणाला चुकविता येतो काय ? मग तुकाराम महाराज
असे कसे म्हणतात?
प्रारब्धाचा भोग हरिकॄपेने नष्ट होतो असे एकनाथ महाराज म्हणतात.
एकाजनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकॄपे त्याचा नाश असे ॥
भक्ती पुर्णत्वाला गेली की भक्ताला प्रारब्ध, संचित, क्रियमाण यांची
काही पिडा होत नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे.
प्रारब्ध क्रियमाण । भक्ता संचित नाहीं जाण ॥
आता देव अंतरी प्रकट झाल्यावर आपण स्वत: देवरुपच झाल्यावर
लोकांशी आपला व्यवहार कसा राहिला आहे हे तुकाराम महाराज
अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥
तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी शुद्ध झाली असून
"जन हे जनार्दनच आहेत" असे जाणून ती प्रेमाने गोड बोलत आहे.
नामस्मरणाने वाणी शुद्ध पवित्र पुण्यवंत होते असे तुकाराम महाराज
म्हणतात.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ ॥
आपल्यासह सर्वत्र तो एकटा परमात्माच भरलेला आहे ही परम
अनुभुती होय. सर्व संतांना ही अनुभुती आली. ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात -
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ।
नाथबाबा वर्णन करतात -
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥
तुकाराम महाराज म्हणतात -
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरुनि ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनि मानसीं ॥
सर्वत्र परमात्मा आहे असे जाणून आपण सर्वांशी प्रेमाने वागावे
आणि प्रेमाने गोड बोलावे हीच खरी संक्रांत, हेच खरे संक्रमण होय.
हाच खरा मकर संक्रांत साजरा करण्याचा उद्देश होय.