Saturday 24 September 2016

प.पू.गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठलमहाराज घुले पुण्यस्मरण त्यानिम्मिताने त्यांच्या जीवनातील आपणा सर्वांस शिकवण देणारा एक प्रसंग !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
वारकरी सप्रंदायीक शिक्षण देणारी आळंदीतील एकमेव वारकरी शिक्षण संस्था -सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
जगातील एकमेव अध्यात्मिक ज्ञान देणारी संस्था जिथे शिक्षकांनाही वेतन नाही आणि
विद्यार्थ्यांकड़ून शिक्षणाचे शुल्क आकारले जात नाही . याच वारकरी शिक्षण संस्थेतील एक श्रीगुरूतुल्य व्यक्तीमत्व
प.पू. गुरूवर्य विठ्ठलमहाराज घुले .अतिशय शिस्तप्रिय जीवनअसणारे पूज्य महाराज .
पूज्य महाराजांनी हजारो वारकरी नर  रत्न घडवले. पूज्य 
महाराजांबद्दल एका किर्तनात  श्रवण केलेला प्रसंग
बाबांचा पाठ वारकरी शिक्षण संस्थेत  असायचा , वेळेच्या बाबतीत बाबा अतिशय काटेकोर
एक दिवस कुणी एक विद्यार्थी संस्थेत पाठाला थोड़ा उशिरा  आला , त्यांनी बघितले तर गुरूवर्य घुले बाबा  आत जाताना दरवाजा बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांच्या चप्पलाचं दर्शन घेऊन संस्थेत प्रवेश करायचे .
शेवटी विद्यार्थ्यांनी घुले बाबांना विचारलेच  , बाबा आपण  विद्यार्थ्यांच्या चप्पलांचे  दर्शन घेऊन संस्थेत प्रवेश करता ?
तेव्हा घुले बाबा म्हणाले , बाबांनो मी तुमच्या चप्पलांच दर्शन घेऊनच संस्थेत प्रवेश करतो
कारण न जाणो तुमच्यात एखादा अज्ञात साधु व संत असेल??? म्हणून अगोदरच नतमस्तक होऊन तुम्हाला पाठ शिकवतो . यावरून अंदाज आलाच असेल आपणास  काय जीवन असेल सदगुरू घुले बाबांच अशा महात्मांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! नामदेव  महाराज अशा  महात्माचं वर्णन करताना म्हणतात कि ,
ऐसियांचे जो चरित्र आवडी ऐके।
तो या भक्तांबरोबरी तुके।
भोगी वैकुंठ निजसुखे।
स्वयंमुखे बोलिले॥


आज प.पू.गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठलमहाराज घुले यांचे पुण्यस्मरण पूज्य महाराजंच्या चरणी साष्टांग दंडवत  !

- ज्ञानदा 




ब्रम्हीभूत प. पू. स्वामी वरदानंद भारती चरित्र ...!

ब्रम्हीभूत प. पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) यांचे संक्षिप्त चरित्र

मराठवाडयातील सुप्रसिद्ध संतकवी श्री दासगणू महाराज (श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे) स्वतः साक्षात्कारी होते.आधुनिक काळात सकल संतांचे ते उत्तराधिकारी होते असे म्हणणे उचित ठरेल. त्यांनी आपल्या भक्तीरसप्रधान अशा कीर्तनांनी व संत चरित्रात्मक वाड्मयानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली, त्या संत दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांचे शिष्योत्तम, मौलिक वाड्मय निर्माते, आदर्श कीर्तनकार, तत्त्वज्ञ आणि थोर समाजहितैषी असे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचेच संन्यासोत्तर नामकरण “वरदानंद भारती” झाले. त्यांच्या व त्यांच्या वाड्मयाचा संक्षेपात परिचय येथे देत आहोत.
श्री.अनंतरावांचे वडील श्री दामोदर वामन आठवले यांना प्रसंगविशेषाने त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षापासून पू. दादांनी(संत दासगणूंनी) सांभाळले. ते उत्तम गायक होते. संस्कृतचा व्यासंग केलेले होते. त्यांनी कीर्तनसेवाही केली. या गुणज्ञपुत्राचा विवाह संत दासगणू महाराजांनी १९१४ साली कु. कमला महाबळ हिचेशी केला. लग्नानंतर त्यांचे नाव राधा ठेवले. त्यावेळी दासगणू महाराजांच्या मार्गदर्शक गुरूंच्या श्री साईनाथांच्या (शिर्डीकर) सान्निध्यात मंगल कार्य झाले. त्यांचे सुपुत्र हे अनंतराव आठवले! त्यांचा जन्म अनंतचतुर्दशी शके १८४२ इ.स. २६.०९.१९२० पुण्यात शनिवारपेठेत झाला.
दुर्दैवाने श्री. अनंतरावांचे हे पितृछत्र ते ४-५ वर्षांचे असतानाच हरपले. “दामूचे लग्नकार्य झाले तो कीर्तनेही उत्तम करतो, आता आपलीही परंपरा तो सांभाळील या कल्पनेत श्री दासगणू महाराज असतानाच हा आघात झाला आणि राधाबाईंचा मोडलेला संसार सांभाळून तडीला लावण्याचे दायित्व श्री महाराजांनी स्वीकारले. “अंतस्त्यागी बहि:संगी लोके विहर” या न्यायाने ते वागले व अनंतराव, त्यांच्या दोन बहिणी व माता राधाबाई यांचा सांभाळ सर्वतोपरी संत दासगणू महाराजांनी केला.
वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत श्री अनंतराव ब-याच वेळा विषमज्वराने आजारी पडल्याने प्रकृतीने बेताचेच होते. अशा प्रत्येक दुखण्यात त्यांचे जवळ श्री महाराज बसत व विष्णूसहस्त्रनामाचे पाठ म्हणत. श्री अनंतरावांनी पुढे एके ठिकाणी, “मी बरेचदा आजारी पडलो हे माझे भाग्यच कारण माझ्या सदगुरूंचा कोमल स्पर्श सातत्याने मला लाभला”! असे म्हटले आहे.
संत दासगणू महाराजांनीच त्यांचे लौकिक व अध्यात्मिक शिक्षण केले. श्री अनंतराव पंढरपुरातच महाराजांजवळ लहानाचे मोठे झाले.श्री अनंतरावांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. पाठांतर उत्तम होते. स्मरणशक्तीही दांडगी होती.एकदा वाचलेलेही पाठ होत असे. घरचे सारे संस्कार धार्मिक होते. त्यांच्या कीर्तनांचा शुभारंभ १९३६ मध्ये वारक-यांचे अध्वर्यू श्री केशवराव देशमुखांच्या उपस्थितीत झाला. १९४० साली श्री अनंतराव ma^ट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि महाराजांच्या इच्छेलाच प्राधान्य देऊन ते आयुर्वेद महाविद्यालयात पुण्यात दाखल झाले. १९४१ च्या फेब्रुवारीत पंढरीतच चतुर्भुज झाले. सौ.इंदिराबाईंशी विवाहबद्ध झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सक्रीय राजकारणात सहभागी होण्याची त्यांची विशेष इच्छा महाराजांनी अमान्य केली. मात्र याचा कोणताही विपरीत परिणाम श्री. अनंतरावांच्या मनावर झाला नाही. सावरकरांच्या वाड्मयाचा- व्याख्यानांचा परिणाम म्हणता येईल व संत दासगणूंचे मन मोडणार नाही यादृष्टीने श्री अनंतरावांनी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे महाकाव्य “शालिवाहन” निर्माण केले. काही कारणांनी ते पुरे झाले नाही पण त्या १५-१६ सर्गांमधून श्री अनंतरावांच्या अफाट वाचनाची-प्रतिभेची कल्पना येते. १९४४ साली ते आयुर्वेद विशारद झाले. पुढे त्यांनी महाराजांच्या आज्ञेने आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या (श्री. मामा गोखले) इच्छेने पारंगतचा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रविण्यांकाने पूर्ण केला. १९४२ मध्येच “त्रिदोषांची तर्कशुद्धता” हा मौलिक विषय निबंधातून लिहिला जो आयुर्वेद जाणकारांनी प्रशंसिला होता. पुढे पारंगत झाल्यावर त्याच आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य अशी पदे त्यांनी भूषविली ! ते राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सदस्यही होते. आणि सुमारे ४-५ हजार पृष्ठांचे आयुर्वेदीय वाड्मय निर्मिले. त्यांच्या तर्कपद्धती, कुशल अध्यापन, चिकित्साकौशल्य या गुणांची सर्वांवर छाप पडे. प्रशासकीय दायित्वही त्यांनी कौशल्याने निभावले. आयुर्वेदाशी ते एकनिष्ट होते. रसशाळा, महाविद्यालय आणि ताराचंद धर्मार्थ रुग्णालय या सर्वांचे दायित्व सांभाळिले. संस्थेच्या नियामक मंडळातील वाद पुढे विकोपाला जाऊन आयुर्वेदाशी प्रतारणा होण्याचा संभव दिसताच त्यांनी त्यागपत्र दिले. १९५० ते १९६६ असा सोळावर्षांचा काळ त्यांनी संस्थेत व्यतीत केला.
या काळात त्यांचा प्रपंचही नेटकेपणाने झाला. त्यांना पहिला मुलगा झाला परंतु दुर्दैवाने तो अल्पायु ठरला. पुढे त्यांना ईशकृपेने तीन कन्यांची व दोन पुत्रांची प्राप्ती झाली. मुली सुस्थळी पडल्या आहेत. मुलगेही आपापल्या कार्यात कार्यमग्न आहेत.
स्वामीजींच्या निर्याणानंतर त्यांचे थोरले चिरंजीव श्री चंद्रशेखर यांचा आकस्मित मृत्यू झाला. आधी पतिनिधनाचे आणि नंतर पुत्रवियोगाचे दुखः झेलीत सौ. इंदिरा वाहिनी आपले जीवन ईशचिंतनात व्यतीत करीत आहेत.
पन्नास साठ चे दशकात त्यांचे आयुर्वेद विषय व कार्यक्षेत्रातले पितुतुल्य मार्गदर्शक वैद्य श्री मामा गोखले आणि संत दासगणू महाराज यांचा वियोग अनंतरावांना घडला. १९४९मध्ये गुरूंच्या आज्ञेने “कृष्णकथामृत” हे महाकाव्य “दोहाचौपाह” या तुलसीदासांच्या रामायणाच्या धर्तीवर निर्माण केले. सदगुरुंच्या चरित्र व वाड्मयाचा परिचय समाजाला घडविला. संत दासगणूंची अलौकिक गुणवत्ता, त्यांचे मोठेपण व त्यांचे भक्तीरस प्रधान काव्य अनंतरावांमुळेच सर्वाना समजू शकले. सदगुरूंच्या निर्याणानंतर त्यांचे समग्र वाड्मयही दहा खंडात प्रसिद्ध केले. अनंतरावांचा साक्षेप फार मोठा म्हणूनच हे शक्य झाले.
इ. स. १९६६ नंतर नोकरीचे बंधन नसल्याने संत दासगणूंच्या विशाल परिवाराच्या कामासाठी श्री अनंतरावांनी वाहून घेतले. १९६८ मध्ये संत दासगणूंची जन्मशताब्दी साजरी केली. नांदेड जवळील गोरटे या गावात विश्रांतीसाठी संत दासगणू जात. त्या गावीच त्यांची वस्त्र समाधी श्री अनंतरावांनी निर्माण केली आणि संत दासगणूंच्या अनेक थोर भक्तांच्या आग्रहाने “श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे” ही संस्था निर्माण करून ती १९७४ मध्ये पंजीकृत केली.
आता श्री अनंतरावांचे “गुरु परंपरा रक्षण” हे ध्येय ठरले आणि त्या अनुषंगाने संस्कृती संरक्षण व तीवरील आक्षेपांचे निराकरण यासाठी कीर्तन, प्रवचने, व्याख्याने, शिबिरे, परिसंवाद, भेटीगाठीही साधने ठरली आणि अनुस्यूतपणे लोकजागृती करणे हेही ध्येयच बनले. यासाठी “श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान” भाविकांचे श्रद्धाकेंद्र आणि साधना केंद्र निर्माण झाले.
गुरुपदाची धुरा वाहायची तर अध्यात्मिक अधिकार वाढविला पाहिजे म्हणून त्यांनी नोकरीत असल्यापासूनच अध्यात्मिक साधना केली. त्यांनीच एकेठिकाणी व्यक्त केल्याप्रमाणे विष्णूसहस्त्रनामाची साधना त्यांनी केली. श्री महाराज गेल्यानंतर ते नियमाने हिमालयात जाऊ लागले त्यांचे ते एकान्तसेवन या दृष्टीने फार महत्वाचे आहे. १९७१ मध्ये त्यांना श्री नारायणाचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव त्यांनी रूपकात्मकतेने कवितेतून व्यक्त केला आहे. त्यांच्या लहानमोठया अनेक कविता आहेत. सुरुवातीला “भावार्चना” या छोटया पुस्तकात त्या प्रकाशित झाल्या आहेत. ते स्वतः कमालीचे प्रसिद्धी पराड्मुख असल्याने फार उशिरा “भावार्चाने” ची द्वितीयावृत्ती १९९४मध्ये प्रकाशित झाली.नारायणाच्या साक्षात्कारा नंतर ते संन्यस्त वृत्तीने प्रपंचात राहिले. प्रपंच नेटका केला पण त्यात कुठे आसक्त झाले नाहीत.१९९० मध्ये त्यांच्या मातोश्रींच्या निर्याणानंतर त्यांनी उत्तरकाशी येथे स्वामी विद्यानंदगिरी यांच्या कडून १९९१ मध्ये विधिवत न्यास दीक्षा घेतली! आता ते स्वामी वरदानंद भारती झाले!संत दासगणूंची संन्यास घेण्याची इच्छा त्यांच्या या शिष्योत्तमाने अशी पूर्ण केली !!
“ब्राह्मणु हिंडता बरा” या समर्थ वचनाप्रमाणे समर्थाप्रमाणे, स्वामीजींनी तीन वेळा भारत भ्रमण केले. ध्येयासवक्त जीवनाला पूरक ठरेल असे वाड्मय निर्माण केले. काही ज्येष्ठ भक्तांनी वाड्मयाचे प्रकाशन नीटपणे होण्यासाठी १९८२ मध्ये “श्री राधा दामोदर प्रतिष्ठान” ही संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेकडून स्वामीजींचे सर्व ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
महर्षी व्यास निर्मित “ब्रह्मसूत्रे” प्रस्थान त्रयातील मुख्य ग्रंथ! स्वामीजींनी ७-८ हजार ओव्या रचून ‘ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी’ ग्रंथ सिद्ध केला. उपनिषदर्थ कौमुदी नावाने सर्व प्रधान १० उपनिषदांवर भाष्य केले.विशेष म्हणजे श्री नारायण व श्वेताश्वेतर उपनिषदांवरही लेखन केले. हे उपनिषद वाड्मय ५ खंडात प्रसिद्ध असून या पाचव्या खंडात उपनिषद वाड्मयावरील जाणकारांच्या सुमारे ५०-६० प्रश्नांची उत्तरे ग्रथित केली आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायावर स्वामीजींनी विवरण केले आहेच व ते प्रसिध्दही आहे.
“महाभारताचे वास्तव दर्शन” हा ग्रंथ आणि पू. अप्पांची (श्री अनंतरावांची) त्यावरील व्याख्याने ही महाराष्ट्रात सर्वदूर गाजली. मोठमोठया विद्वानांनी महाभारतातील कथेची आणि चरित्रांची जी अवहेलना विकृती करून ग्रंथ छापले होते त्यांचे साधार खंडन व्याख्यानातून व या ग्रंथातून त्यांनी केले. असाच दुसरा आधुनिकांच्या शंका-प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणून प्रश्नोत्तररूप असलेला “वाटा आपल्या हिताच्या” हा ग्रंथ. यातले प्रश्न पहिले म्हणजेच ग्रंथाचा दर्जा लक्षात येतो. “मनाचे श्लोक” हे समर्थांचे एक छोटेसे प्रकरण. मात्र समर्थांचे सर्व सामर्थ्य जणू त्यात प्रकटले आहे. त्या ग्रंथांवरील प्रवचने पू. अप्पांनी केली होती. त्या प्रवचनांचे ग्रंथरूप म्हणजे त्यांचा “मनोबोध” हा ग्रंथ! आज या ग्रंथांची नववी आवृत्ती निघाली आहे, इतका तो लोकप्रिय ग्रंथ आहे.
तत्वज्ञानाचा व्यवहार विशद करणारा “साधक- साधना” ग्रंथ असाच मौलिक आहे. “भगवान श्रीकृष्ण एक दर्शन” मध्ये कृष्णाची राजनीती व धर्म संस्थापने साठी त्यांचे प्रयत्न हाच विषय आहे. “कर्मयोग” (गीता अध्याय ३), आत्मसंयमयोग (गीता अध्याय ६) व जीवन साधना (गीता अध्याय १८) ही त्यांची गीतेवरील लोकप्रिय पुस्तके. त्यांच्या एका चाहत्याने “ज्ञानेश्वरी”कळत नाही, तुम्ही काहीतरी सोपी करून सांगा असा फार आग्रह केला. पू. अप्पांनी ते मनावर घेतले नि ४-५ महिन्यात समओवी-अनुवाद ज्ञानेश्वरी सिद्ध केली. मूळ ९०३३ ओव्यांचे रुपांतर अवघ्या दहा हजार प्रचलित मराठी भाषेतील ओव्यात केले. म्हणून तो समओवी अनुवाद !
याशिवाय लहानमोठे प्रकरण ग्रंथ आहेतच. निर्याणापूर्वी त्यांनी ११०० पृष्ठांचा ” सार्थ- सभाष्य मनुस्मृती” हा ग्रंथ सिद्ध केला. अधुनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणून मनुस्मृतीची “भूमिका” लिहिली ती १०० पृष्ठांची.नंतर आजच्या अपेक्षांच्या संदर्भात मनुस्मृतीचा प्रत्येक श्लोक सार्थ लिहिला आणि आपल्या खंडन-मंडना प्रीत्यर्थ उपयुक्त असे पुरावे शेवटी २५०-२७५ पृष्ठांत “परिशिष्टे” म्हणून मांडलेत. प्रामाणिक अभ्यासक, तो विरोधक असला तरी या ग्रंथाबाबत असे म्हणेल की came to scoff but remained to pray ! असा हा मौलिक ग्रंथ आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे स्वामीजींचे सुमारे ५० तरी ग्रंथ प्रकाशित आहेत. या सा-या वाड्मयात त्यांचे राष्ट्रचिंतनही उत्कटपणे व्यक्त झालेले आहे.
सततोद्योगी असे हे व्यक्तिमत्व मनुस्मृतीलिखाणा नंतर उत्तरकाशीला गेले. निर्याणाचा दिवस नक्की केला.दोन दिवस आधी कैलासाश्रमाचे व्यवस्थापक श्रीउमानंद स्वामीजींना थोडी कल्पना दिली होती. ३ सप्टेंबरला स्वामीजी गंगास्नानार्थ गेले. परत आल्यावर परिवारातील व्यक्तींना म्हणाले, आता मी बंद केलेले दार ४ तासांनी उघडा. आत गेल्यावर काही आन्हिके केली व सिध्दासन घालून आसनस्थ झाले. ४ तासानंतर परिवारातल्या व्यक्ती आत गेल्या तो त्यांना दिसले स्वामीजी उजव्या हाताने नारायणाचे पाय धरून आहेत, मस्तक विनम्र आहे व डावा हात कमंडलू वर स्थित आहे.
ते पाहताच कल्पना आली. प्रमुख संन्याशांना बोलावून त्यांच्या सहायाने त्यांना भिंतीपाशी बसवले. पु. स्वामीजी त्यानंतर ४४-४५ तास श्वसन करीत होते. मात्र अन्य कोणतीही प्रतिक्रिया- प्रतिसाद नव्हता. ५ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी साडेपाच वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला.
समाधीला बसण्यापूर्वी पत्रे-संदेश इ. लेखन केलेले कागद तेथे होते. त्यातील संदेशात ते म्हणतात :
मी म्हणजे ना शरीर | मी मद ग्रंथांचा संभार ||
त्यांचे वाचन चिंतन | यथा शक्ती आचरण |
हीच गुरुपूजा खरी | नीट धरावे अंतरी ||
या शिवाय अन्यही वर्णन त्या अंतिम कवितेत आहे. ही त्यांची संजीवन समाधी जनमानसाला थक्क करणारी होती. त्यांच्या इच्छेप्रमाणेच त्यांचे पार्थिव ०६.०९.०२ रोजी गंगार्पण करण्यात आले.
मन, वाणी, बुद्धी ही श्रमली देश हितार्थासी |
संस्कृती संरक्षणार्थ बनले योध्दा संन्यासी ||
धर्माचरणी निरपवाद जणू गांगेयची सार्थ |
यथार्थ आचरणे जिंकियले चारही पुरुषार्थ ||

- varkariyuva.blogspot.in