Friday 27 January 2017

आत्मस्तुती - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर


माणसाच्या विद्यार्जनामध्ये आणखी एक शत्रु आहे ती म्हणजे स्तुती !
ही स्तुती माणसाला विद्यार्जनापासून दूर नेते.कारण स्तुती माणसाच्या मनात अहंकार निर्माण करते आणि अहंकार आला की विद्या येत नाही.
ही स्तुती दोन प्रकारची असते.एक आत्मस्तुती आणि दुसरी इतरांनी केलेली.काही लोकांना स्वत:चीच स्तुती स्वत: करून घेणे फार आवडते.एखादा विद्यार्थी खुप पाठांतर,अभ्यास करेल .ती चांगलीच गोष्ट आहे.त्याचा त्याच्या जीवनावर चांगला परिणाम होईल,पण आपण केलेले कष्ट,त्याला प्राप्त झालेले फऴ,याची तो स्वत:च स्तुती करू लागला तर ते योग्य नाही.माझ्याएवढी अभ्यास कोणी करत नाही,माझ्याएवढे पाठांतर कोणालाच नाही वगैरे तो स्वत:चीच स्तुती करू लागला तर ते त्याच्या पुढच्या जीवनाच्या दृष्टीने चांगले नाही.कारण त्या स्तुतीने अहंकार निर्माण होतो आणि ' आपणास सर्व कऴते ' या अहंभावाने त्याचे शिक्षण थांबते.म्हणून महाभारतामध्ये म्हंटले आहे,
आर्येण हि न वक्तव्या कदाचित्स्तुतिरात्मन: ।
आर्य मनुष्याने कधीही आत्मस्तुती करू नये आणि विद्यार्थ्याने तर मुऴीच करू नये. आणि स्तुतीचा दुसरा प्रकार म्हणजे इतरांकडून होणारी स्तुती ! पुष्कऴ वेऴा विद्यार्थ्याचे पालकच त्याची इतकी स्तुती करतात,की तो विद्यार्थी स्वत:स शहाणा समजू लागतो.आपणांस आपल्या मुलाचे कौतुक वाटणे ( जर तो हुशार असेल तर ) स्वाभाविक आहे,पण लगेच त्याची स्तुती करू नये.एखाद्या यशानंतर आपले कौतुक होते,पण विद्यार्थ्याने ती स्तुती मनावर घेऊ नये.ती गोड वाटते,पण घातक असते. ' स्तुती परविया मुखे रूचिकर । '
असे श्रीतुकाराम महाराज सांगतात.पण ती घातक असते म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ' पूज्यता डोऴा न देखावी । स्वकीर्ति कानी नायकावी ।' म्हणून उपदेश केला आहे.म्हणून दुसऱ्यांनी केलेली स्तुती हीदेखील विद्येची शत्रूच आहे.त्यामुऴे माज निर्माण होतो.श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ' तैसा माजे स्त्रिया धने। विद्या स्तुती बहुने माने ।' आणि विद्येसाठी ही स्तुती घातक आहे.स्तुतीने संकोच निर्माण व्हावा.अहंकार नव्हे ! म्हणून विद्यार्थ्याने या शत्रूपासून सावध राहावे.माणूस अनंत काऴाचा विद्यार्थी आहे !

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

ह.भ.प.प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar

गुरूबंधू म्हणजे काय ?


जन्माला येणारा प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. म्हणून जन्माला येणार्‍या व्यक्तीला जातक असे संबोधले जाते. आत्मा जन्म घेत नाही तर शरीर जन्म घेते. म्हणजे जन्माला आलेले ते शरीर केव्हा तरी मरणारच. खरी गंमत येथेच आहे. कारण  आत्मदेव तर ब्रम्हज्ञानी आहे. तरी पण देहातून मृत्यु समयी बाहेर पडलेला आत्मा पुन्हा एखाद्या गर्भातुन प्रसुत होई पर्यंत ब्रम्हज्ञानी असतो. आणि सतत चिंतन करित असतो. हे ज्ञान असून सुध्दा मी पुनरपि जन्म  पुनरपी मरणम चक्रात का अडकतो ? तरी या जन्मात मी माझ्या जवळील ज्ञानाचा उपयोग करून याच्यातून मुक्त होईल आणी ब्रम्हपदाची  प्राप्ती करून घेईल. असे विचार स्थिर होत असताना ती दिव्य प्रसुतिची वेळ समोर येते त्या आत्मदेवाला ही  मोठी संधी वाटते परंतु प्रसुति नंतर त्या जातकाच्या टाळूला मृत्यु लोकीचा वायु स्पर्श करतो आणि जवळ असलेले ज्ञान विस्मृतीत जाते. आणि जातक रडायला लागते.

आता पुन्हा शुन्यापासून जीवन प्रवास सुरू झाला. तरी पण त्याची कुंडलीनी जागृत अवस्थेत वयाच्या ८व्या वर्षपर्यंत असते.याच वेळेला किंवा येथून पूढील प्रवासासाठी
सद्गुरुंकडून मिळालेला अनुग्रह जसे मंत्रदीक्षा, स्पर्शदीक्षा, ध्यानयोगदीक्षा,  शांभवि दीक्षा हा त्या व्यक्तीचा नूतन जन्म मानला आहे. आणी  सद्गुरु म्हणजे "त्वमेव माताच पितात्वमेव" या न्यायाने आपले सद्गुरू आपले माता पिता बंधु सखा होतात आणि आपला अध्यात्मिक परिवार तयार होतो. आपल्या सद्गुरुंनी दिलेले सर्व अनुग्रहित हे आपले बंधू भगिनी होत. कारण प्रत्येकची गुरूमाउली एकच आहे आणि त्या माउलीला प्रत्येकाला बोटला धरून ब्रम्हज्ञानाच्या अवस्थेकडे आपल्या या लेकराला न्यायचे असते किंबहुना याचसाठी हे सर्व घडत असते.
गुरूबंधु म्हणजे सद्गुरुंच्या तत्वांपाशी जो आबध्द होतो किंवा सद्गुरुंच्या दर्शित मार्गामधे जो बांधला जातो म्हणजेच स्वतःला विसरून जातो आणि गुरुमय होण्याची ज्याची धडपड आहे. गुरूपरिवाराला काहितरी वेगळे देण्याची ज्याची तयारी असते. त्यांना गुरुबंधु असे एकमेकात
संबोधले जाते. बंधु किंवा भगिनी या शब्दांच्या मुळाशी परम सात्वीक भाव उत्पन्न होतात. आदरणीय विवेकानंदांनी या दोन शब्दावर शिकागो परिषद जिंकली होती म्हणून एकाच गुरूंच्या अनेक शिष्यामधे जे अदृश्य सत्व भाव भावनांचे जाळे विणले जाते सत्व वृत्तीकडे धावायला लागते त्यां नात्याला गुरुबंधु असे समजतात.