।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
आज दादांचे,
नियोजीत वेळेवरच त्र्यंबकेहुन,
नविनच बनविलेल्या रजतमुद्रित भव्य रथातुन,
परमपिता पांडुरंगाचे भेटीसाठी आषाढी वारी निमीत्त, टाळमृदंगासहीत वारकर्यांसमवेत त्र्यंबकराजांच्या साक्षीने, भव्य प्रस्थान झाले. आषाढी परंपरेनुसार पुर्वापार चालत आलेला हा वारीचा वसा सर्व ठिकठिकाणच्या संतांच्या समाधीस्थळाहुन भक्तीभावाने प्रेमपुर्वक आजतागत जोपासला जातोच आहे . पण, *सकलही तिर्थे निवृत्तीच्या पायी*
असे असतांनासंतश्रेष्ठ निवृत्तिनाथांना पांडुरंगाची एवढी ओढ का लागली असावी की त्यांनाही श्री'क्षेत्र पंढरी जाण्याचा मोह आवरताच आला नसावा...
कारण, पंढरीच्या तिर्थसुखासारखे सुख त्रिभुवनात कोठेच उपलब्ध नाही,हेच स्पष्ट करतांना सेना महाराजही एका अभंगात सांगतात की-
*जाता पंढरीशी सुख वाटे जीवा।*
*आनंदे केशवा भेटताची॥*
पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीनंतर जो आनंद मनात उत्पन्न होतो .त्यातुनच जीवाला अनुपम्य सुखाची अनुभुती होते, जी अनुभती इतर क्षेत्रांमधून सहज प्राप्त करताच येत नाही, म्हणुनच शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी इतर तिर्थांपेक्षा निःसंशय पंढरी ही वैष्णवांसाठी सर्वोत्तम तिर्थ आहे. अशा या तिर्थाचे वर्णन करतांना महाराज सांगतात की
*या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।*
*पाहीली शोधोनी अवघी तिर्थे।*
आता एवढं अनुपम सुख जर हे असेल तर
हे सुख किंवा हा आनंद म्हणजे नेमकं
काय असावे..? याबाबत सांगायचे झाल्यास,देहांत प्रायश्चिताला जातेवेळी निवृत्तीदादांना त्यांची आई रुक्मिणीमातेने सांगितले होते की आमचेनंतर पंढरीश पांडुरंग परमात्मा व रुक्मादेवी हेच तुम्हां सर्वांचे आराध्य समजावे, तसेच तेच तुम्हा सर्वांचा अगदी मातपित्याप्रमाणे सुख-दुःखात पुर्णपणे सांभाळ करतील, हि बाब कदापी विसरु नका..! आईचें शब्द तर संत निवृत्तीदादांनी अगदी प्राणपणाने जपलेले आहेत, हे आपण सर्व जाणतोच ना.मग ज्यांचे आराध्य व आईवडील दोन्ही जर एकच पांडुरंग परमात्मा असेल तर अशा शाश्वत आईवडीलांची भेट वर्षातुन कितीही वेळा घेतली तर त्या भेटीतुन मिळणार्या आनंदसुखाचे वर्णन आपल्यासारख्यांना कसे करता येईल.परिणामी, निर्गुण उपासक असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिदादांना सगुणातीत
पंढरीच्या विठ्ठलास भेटण्याची आस लागणेचे हे एक कारण असल्याचे सांगतांना दादा म्हणतात की-
*निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज।*
पुन्हा
संपुर्ण आयुष्यभर ज्या पांडुरंगाने
निवृत्तीनाथांनी रुक्मिणी मातेला
तिनही भावंडांना मार्ग दाखवल्याशिवाय मी निवृत्त होणार नाही, अशाप्रकारचा दिलेले वचनरुपी शब्द सांभाळण्यास ज्यांनी पुरेपुर सहकार्य केले त्या पांडुरंगाला निवृत्तीदादांनी विसरावे तरी कसे..?
कारण
संत ज्ञानेश्वरांच्या संजिवनसमाधी वेळी रडणारा हाच पांडुरंग परमात्मा सोपानकाकांना मार्गस्थ करण्यास निवृत्तीदादांना साहाय्य करण्याचे विसरत नाही, तसेच आईसाहेब मुक्ताबाईला मुक्त होण्याची दिशा देतांना संत नामदेवरायांच्या संगतीने अवचीत लीला काय रचतो...
वरील तिन्ही घटनांमधुन निवृत्तीदादांना वारंवार सांभाळणाराही हाच पांडुरंग परमात्मा न चुकता हजर होताच ना.
तसेच निवृत्तीदादांच्या समाधीवेळीही जो भगवंत क्षणभरही उसंत घेत नाही,
अशा भगवंताच्या अनंत उपकारातुन निवृत्तीदादांना सुध्दा मुक्त होता येणारच नाही ना.
म्हणुन पांडुरंगाच्या अनंत उपकारातुन निवृत्तीदादांनी मोकळे होण्यापेक्षा विठ्ठलाचाच मुद्रांकित सेवक होणे योग्य समजले असावे.
तर शेवटचा संदर्भ सांगावासा वाटतो की,
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार
संत निवृत्तीनाथ हे शिवाचा अवतार
आणि अनादी कालापासुन शिवजी हे विठ्ठलाचे परमउपासक आहेत हे आपण जाणतोच ना...
मग एवढा सारे पुरातन संबंध विठ्ठलाशी असतांना शिवाय सनकादिक मुनींनाही ज्यांचे दर्शन दुर्लभ झाले होते तोच परमात्मा आज भक्तांची वाट पाहत पंढरीच्या वाळवंटी उभा आहे .
*वाट पाहें उभा भेटींची आवडी।*
परिणामी निवृत्तीदादा जरी शिवजींचा अवतार असले तरी ते विठ्ठलाचे भक्तच म्हणुन सर्व संतांमधे सर्वश्रेष्ठ ठरले.मग सर्वश्रेष्ठ भक्ताला पांडुरंगाचा वियोग सहन होईल तरी कसा..!जेणेकरुन सकल तिर्थे जरी निवृत्तीदादांच्या चरणावर लोळत असली तरी,
*पंढरीचे सुख नाही कोण्या धामा..।*चला तर मग..!
जय मुक्ताई ।।
- Varkariyuva.blogspot.in
Fb.com/Varkariyuva