Thursday 6 April 2017

नित्यपाठ मालिका - जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून ● अभंग निरूपण

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥

अभंगाचा सब्दार्थ :_
जन्म का येतो ते शोधले तर असे आढळते की दु:खभोगण्यासाठीच जन्म येतो ॥ १॥
पापे व पुण्य केल्याने प्राण्याला जन्म येतो. पन नरजन्मास येऊनही तो स्वत:ची हानीच करतो॥ २॥
ज्याच्या अंगी सत्व रज तम हे गुण आहेत तो ह्याच गुणांमुळे जन्म वाय घालवतो ॥ ३॥
तम म्हणजे फक्त नरकच होय व रजोगुण म्हणजे मायाय्जाळात अडाकणॆ होय ॥ ४ ॥
तुका म्हणतो की सत्याचे हेच सामर्थ्य आहे की जन्मापासून मुक्ती मिळाते व (सत्य समजावे म्हणून ) दिवसरात्र परमार्थसाधन करावे ॥ ५॥
अभंगाच्या मागची भूमिका :-
कीर्तन करता करता संत तुकारामहाराज सदेह स्वर्गास गेले . महाराजांनी स्वर्गामधून एकूण १४ अभंग नित्यपाठासाठी पाठवले असे मानले जाते. ह्या अभंगांमधे महाराजांच्या शिकवणूकीचे सार आलेले आहे.
ह्या अभंगांमधील पहिला अभंग आपण पाहात आहोत.
अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराज म्हणताहेत की आपण दु:खे भोगतो त्याचे कारण आपण ह्या जगतात जन्म घेतला आहे. आपल्याला अनेक प्रकारची दु:खे जीवनात भोगावी लागत असतात. उदा कोणी आपले ऐकले नाही, मनाप्रमाणे कांही घडले  नाही तर दु:ख होते. शरीराला रोग झाल्यामुळॆ दु:ख होते. आपला कांही तोटा झाला, कोणी जवळचे मृत्यू पावले तर दु:खच होते.कोणी अपमान केला तर दु:ख होते. समर्थ रामदासांनी स्रि.दासबोधामधे शास्त्रांनी सांगितलेले तीन प्रकारचे ताप “ आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक “ हे दु:खांचे तीन प्रकारामधे वर्गीकरण करतात..
सोप्या शब्दात सांगायचे झाले की दु:खे कां भोगावी लागतात? ह्या प्रश्नाचे उत्तर एकच येते आहे की शरीर धारणा झाल्याने, व शरीर कां मिळाले?  तर जन्म घेतला म्हणून.
आणी जन्म कां आला? ह्याचे कारण तुकाराम महाराज अभंगाच्य दुसऱ्या चरणामधेव देताहेत.
दुसऱ्या महाराज म्हणतात की पापे अथवा पुण्यकर्मे केल्यामुळे जीवात्म्याला जन्म येतो. आपण पहातोच की ह्या पृथ्वीव्रर अनंत प्रकारचे प्राण्य़ाचे प्रकार आहेत. आपल्याकडे असे म्हटले जाते की ८४ लक्ष प्रकारचे प्राणी आहेत. त्यांमधे माणूस पण येतो. भागवत असे सांगते की जेंव्हा पाप व पुण्य बरोबरीचे होतात तेंव्हा माणसाचा जन्म येतो.
एक माणूसच असा आहे की ज्याला विचार करण्याची , योग्यायोग्य समजण्याची क्षमता आहे. ईतर सर्व प्राणी आहार, निद्रा, भय( मृत्यूचे) ,मैथून हे व्यवहार करतच असतात. त्यांना पाप म्हणजे काय व पुण्य म्हणजे काय ते कळत नसते. शास्त्रे असे सांगतात की ईतर सर्व योनींमधे जन्म येतो ते फक्त पापकर्मांचःई फळे भोगण्याकरता व म्हणूनच शास्त्रे पुढे हे पण सांगतात की फक्त नरजन्मातच जीवाला “आपला जन्म कां झाला, आपल्याला दु:खामधून कायमची मुक्ती मिळेल काय, कशी?मला कोणी निर्माण केले?  “ ईत्यादी प्रश्न पडतात व त्यांच्यावर विचार, मनन करता येते. चांगले कर्म म्हणजे काय ते कळते.
पाप करणे म्हणजे वासनांच्या मागे लागून त्या पूर्ण व्हाव्या म्हणून प्रयत्न करणे होय. पण हा मुद्दा पण महत्वाचा आहे की वासना कधीच शमत नाहीत .अतृप्ती हा वासनांपूर्तीचा परिणाम आहे . ह्या अतॄप्त वासना जर एका जन्मात शमल्या नाहीत तर त्या पूर्ण करण्या करता जे शरीर योग्य असेल तस जन्म परत येतो. नवा जन्म माणसाचाच जन्म येईल असेही म्हणता येत नाही. म्हणुन तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की पाप केल्यामुळे जन्म येतो.
पण कांही वासना चांगल्या पण असतात.भगवद्‍भेटिची वासना ही नक्कीच चांगली म्हणता येते. अशी वासना असणारी व्यक्ती भगवद्‌भक्ती, लोकांची सेवा करणारी असते. जर ही वासनापूर्ती एका जन्मात झाली नाही तर अशी व्यक्ती चांगल्या कुळात जन्म घेते व पुढच्या जन्मी त्याची भगवद्‌भेटीची वासनापूर्ती होते. एकदा कां भगवद्‍भेट झाली की त्याच्याशी ऐक्य घडल्यामुळॆ अशी व्यक्ती जन्म मृत्यातीत होते. ह्यालाच नरजन्माचॆ सार्थक करणे म्हणतात.
श्रीमद्‍ भगवद्‌गीतेमधे ह्याबद्दल स्वत: भगवतानेच ६ व्या अध्याय ह्याची ग्वाही दिली आहे. असे स्वत:च्या नरज्न्माचे सार्थक न करणे म्हणजेच स्वत:ची हानीच करणे होय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराजांनी हे स्पष्ट केले अहे.

ह्या नंतर अभंगांच्या ३ ऱ्या व ४ थ्या चरणांचा अर्थ ते एकत्र घेऊनच लिहिला आहे..
हे चरण खालील प्रमाणे आहेत.
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी। याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
शब्दार्थ:- ज्याच्या अंगी सत्व रज तम हे गुण आहेत तो ह्याच गुणांमुळे जन्म वाय घालवतो तम म्हणजे फक्त नरकच होय व रजोगुण म्हणजे मायाजाळात अडकणॆ होय.
अगदी हेच श्रीमद्‍ भगव्द्‍गीतेमधे भगवान श्रीकॄष्णांनी पण खालील श्लोकामधे सांगितले आहे.
सत्वे रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा:। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌॥ गीता.अ.६-६ 
श्लोकाच अर्थ:- हे अर्जूना, सत्व, रज, तम, हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहात बद्ध करून ठेवतात.
“करावे तसे भरावे”” हा आपण वावरत आहोत त्या दॄश्य जगाचा नियम आहे. अर्थात कोणतेही कर्म केले तर त्या कर्माची फळे भोगावीच लागतात.
निषिद्ध, वाईट कर्म म्हणजे जे केल्यामुळे ईतर प्राण्यांना इजा होते, त्रास , दु:खे भोगावी लागतात ते कर्म. हे कधी प्रत्यक्ष शरीराद्वारा केले जाते, कधी वाचे द्वारा पण केले जाते . उदाहरणार्थ उद्वेगकारक कठोर बोलणे, खोटे बोलून दुसऱ्याचे नुकसान करणे, शिव्या देणे, ईत्यादी. ही कर्मे करण्याची बुद्धी तमोगुणी होय. ह्या प्रत्येक कर्माचे फळ ह्या किंवा पुढच्या जन्मात भोगावेच लागते.
बऱ्याच वेळा हा प्रश्न लोक विचारताना दिसतात की मी नीट चांगला वागूनही मला हे भोग त्रास, ताप कां आले? ह्याचे उत्तर हेच की “ पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ “ . जर ह्या जन्मात अशा कर्मांचे फळ भोगले गेले नाही तर परत जन्म येतो. शास्त्रे, गीता व संत हेच सांगतात की तमोगुणाच्या अधिपत्याखाली केलेल्या कर्मांमुळे जीव अधोगतीला जातो. त्याला पशू योनींत जन्म येतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी तमोगुणाला नरक असे अभंगात म्हटले आहे.

रजोगुण व सत्वगुणांचे दोन प्रकार असतात. १) शबल ( ह्यालाच तुकाराम महाराजांनी अभंगा,मधे सबळ असे म्हटले आहे.) २) शुद्ध .
रजोगगुणामुळे माणुस कर्म करतो. हे कर्म फक्त जगामधील निरनिराऴ्या विषयांचा उपभोग गेण्यासाठी, तसेच स्वर्गसुखासाठी जर केले;तर ते शबल कर्म ठरते. स्वार्थप्रेरित कर्म करण्याची कृती होण्यास शबल रजोगुण कारणीभूत असतो. अर्थात जगाच्या नियमाप्रमाणे ह्याकर्मांची फळे ह्या जन्मात कधी भोगायला मिळतात , तसेच कधी पुढच्या जन्मांत भोगावी लागतात. रजोगुणाला म्हणूनच “ मायाजाळ “ असे तुकाराममहाराजांनी अभंगामधे संबोधिले आहे.

सत्वगुण पण शबल असू शकतो. अशी माणसे चांगली कामे करतात पण त्या मागे स्वत:चा कांही तरी फायदा अपेक्षित असतो. उदाहरणार्थ: लोकांनी चांगले म्हणावे म्हणून, लोकांनी ज्ञानी म्हणून आपल्याला ओळखावे म्हणून सात्विक माणसे कर्म करताना आढळतात. अहंकार वाढीला लागणे हा ह्या सात्विक कर्मांचा परिणाम होय. समजा मनासारखे घडले नाही तर ह्या वासनेचे बीज तयार होते व पुनर्जन्माची तयारी नकळत होते.
नवा जन्म म्हणजे पुन्हा कांहितरी दु:खे वाट्याला येतातच.
थोडक्यात असे म्हणता येते की शबल रजोगुण, तसेच शबल सत्व गुण पण जीवाला जन्ममृत्यू चक्रामधे फिरवित राहतात.
शुद्ध रजोगुणाच्या प्रभाव खाली माणसाच्या हातून शुभकर्मे होतात, जसे पूजाअर्चा, तीर्थयात्रा, दानधर्म वगैरे. शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव असेल तर ही सर्व कर्मे नि:ष्काम भावाने: ईश्वराची पूजा म्हणून केली जातात. त्यामुळे मन:शुद्धी नक्की होते. पण खरे ज्ञान ह्यामुळे मिळत नाही. अहंकार क्षीण होतो पण समूळ लयाला जात नाही. अशा व्यक्तींना जर ह्याच जन्मी मोक्ष, मुक्ती मिळाली नाही तर त्या उत्तम कुळात जन्म घेतात व त्यानंतर मुक्त होतात असे गीतेमधे भगवंताने ६ व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे.
म्हणूनच तुकाराम महाराजा अभंगात म्हणताहेत की “रजतमसत्व ज्याचे अंगी आहे ज्याचे अंगी त्याचा याच गुणांमुळे ह्या जगी जनम वाया गेला ॥ ३॥ तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥

गुणांचा परिणाम काय ते भगवंतांनी भगवद्‍गीतेतल्या खालील श्लोकामधे सांगितले आहे.
उर्ध्वं गच्छंति सत्वस्था मध्ये तिष्ठंति राजसा:। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छंति तामसा: ॥ गी ६-१८
सात्विक आचरणाचे लोक वर म्हणजे देवलोकात जातात, राजसिक आचरणाचे लोक मध्यम
( मनुष्य) लोकात राहातात व नित्कृष्ठ अशा तामस गुणाचे लोक अधोगतीला जातात.
श्री समर्थ रामदासांनीही दासबोधामधे सांगितले आहे. समर्थ म्हणतात की
सत्वगुणॆं भग्वद्‍भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती। तमोगुणें अधोगती । पावती प्राणी।।
दासबोध द.२ समास.५ ओवी २

अभंगातले शेवटचे चरण आहेत “ तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥

येथे सत्य महणजे जे शाश्वत आहे ते अर्थात परब्रह्मच , भगवंतच  होय. ह्या सत्याचे ज्ञान होणे तेंव्हाच घडते जेंव्हा त्याच्याशी ऐक्य होते. ह्या ज्ञानाच्या स्थितीलाच “ आत्मज्ञान किंवा स्वस्वरूपाची ओळख पटणे “, “ मोक्ष मिळणे “ “ भगवद्‍भेट होणे “ असेही म्हटले जाते. स्पष्टच आहे की ही स्थिती ह्या नरदेहाचीच असते.
आत्मज्ञानाची महती सांगणारा श्लोक आहे
नानाशस्त्रं पठेल्लोको नानादैवत पूजनम्‌ । आत्मज्ञानं विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम्‍ ॥
शंकराचार्य आत्मज्ञानची महती सांगताना भजगोविंदम्‍ मधे म्हणतात
कुरूते गंगा सागर गमनम्‌ । व्रतपरिपालन अथवा दानम्‌ । ज्ञानविहीनं जन्म अनेन । मुक्तीर्नभवती जन्म शतेन ॥
दोन्ही श्लोकांचे सार एकच की आत्मज्ञानविना म्हणजेच सत्याच्या ज्ञानाविना सर्व व्यर्थ आहे.
असे कां म्हतले आहे त्याचे कारण हेच आहे की हे ज्ञान मिळाले की मनुष्य जन्ममृत्य़ूचक्रामधून कायमच सुटतो. हेच नरजन्माचे खरे सार्थक आहे असे सर्व संतांनी पण म्हणूनच सांगितले आहे.

तुकाराम महाराजांनी अभंगात वर्णन केले ते सत्याचे समार्थ्य हेच आहे
“ हे ज्ञान व्हावे म्हणून तू गुणातीत हो “ असे गीतेमधे भगवंत अर्जूनास सांगतात. गुणातीत होणे म्हणजे अहंकार , मीपणा हा संपूर्ण लयाला जाणे होय.
प्रयत्नांनी आपले मन शुद्ध होऊन हा मी पण क्षीण होऊ शकतो. व नंतर  अशा व्यक्तीला सद्‍गुरू स्वत:च येऊन त्याचा जो कांही उरलेला अहंकार असतो तो सुद्धा नष्ट करतात. व त्याला आत्मज्ञानी करतात .
आत्मज्ञानासाठी  प्रयत्न करणे म्हणजेच परमार्थ करणे होय. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ह्या प्रयत्नाचे रूप वेगवेगळे असते. कोणी भक्तीमार्ग धरतो तर कोणी ज्ञानमार्गावर जातो. सर्व प्रकारच्या अशा प्रयत्नांनाच “ परमार्थ साधना “ असेही म्हणतात.

अभंगाची शिकवण :
शिकवण हीच आहे की कांहीतरी परमार्थ साधना जरूर करावी.

                        ॥ हरि ॐ॥

Monday 3 April 2017

गानसरस्वती श्रद्धेय किशोरीताई आमोणकर कालवश ...!

संत श्रीजनाबाईमहाराजांचे व्यक्तित्व आपल्या समर्थ अभंग गायनातुन व्यक्त करणारी ,अभिजात स्वरांच्या स्वर्गीय वातावरणाची आपल्या बैठकीत अद्वितीय निर्मिती करणारी, आध्यात्मिक स्तरावरील अनुभूति प्रत्यक्षात अनुभवून मूर्तिमान करणारी जयपुर घराण्याचा अखंड गौरव वाढवणारी गानसरस्वती श्री. किशोरीताई अमोणकरांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजलि ।

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र