Tuesday 21 June 2016

संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

||ज्ञानेशो भगवान विष्णु ||

संतश्रेष्ठ सोपानकाका हे संत ज्ञानेश्वर माऊली,निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांचे बंधू .सोपानकाका आळंदी जवळच असणाऱ्या "सासवड" गावी समाधीस्थ झाले.
ह.भ.प वै धोंडोपंत दादा महाराज अत्रे १५० वर्षापुर्वी पंढरीत वास्तव्यास असणारे थोर भवगदभक्त होते.धोंडोपंत दादा महाराज हे "सदगुरु ह.भ.प वै. गंगुकाका महाराज शिरवळकर महाराज" फडपरंररेचे शिष्य होते.महाराजांची 'वारी' वर अफाट निष्ठा होती. संत तुकोबारायांचा गाथा,ज्ञानेश्वरी इ.ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. आणि अशा थोर भगवदभक्त निष्ठांवत वारकरी असणाऱ्या "वै.ह.भ.प धोंडपंत दादा महाराज अत्रे" यांनी संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा अंदाजे साधारण १२५ वर्षापुर्वी संत सोपानकाकांचे त्यावेळचे पुजाधिकारी ह.भ.प वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांच्या सहकार्याने चालु केला.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा जेव्हा सुरु झाला तेव्हा २०० वारकरी या सोहळ्यासोबत असत.सुरुवातीचे काही दिवस खांद्यावर पालखी घेऊन सोहळा चालत असे.पण कालांतराने रथ बनवला गेला.या सोहळ्यात पहिल्यापासुन धोंडोपंत दादा महाराज अत्रे,खरवडकर महाराज,देशमुख महाराज यांच्या दिंड्या आहेत.
वै.ह.भ.प धोंडोपंत दादा महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचेच शिष्य असणाऱ्या वै.ह.भ.प भगवान महाराज शिवणीकर यांनी हा सोहळा चालवला.तर आता भगवान महाराजांचे वंशज आमचे आदरणीय ह.भ.प माधव महाराज शिवणीकर हे ह्या सोहळ्यास चालवण्यास मोलाचे सहकार्य करतात. तर सध्या वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे नातु ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत.
हा पालखी सोहळा सासवड-मोरगांव-अकलुज-वाखरी या मार्गे पंढरीत दाखल होतो.
आताच्या काळात जवळपास १ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
यंदांचा संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा अंदाजे १२५ वा असेल असे वाटते.
[खुप पुस्तके चाळुन,जेष्ठांच मार्गदर्शन घेऊन ही संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास एवढाच ज्ञात झाला. तेवढा आपल्यासमोर मांडला आहे.]

©श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

-varkariyuva.blogspot.in

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
वै.सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर....! श्रीरामपुर जवळ सध्या नगर जिल्ह्यात असणारे "बेलापूर" हे शाहु महाराजांचे मुळ गांव. शाहु महाराज म्हणजे सदगुरु सखाराम महाराज अंमळनेरकर यांचे पट्टशिष्य.शाहू महाराज बेलापुरकर एक थोर विद्वान आणि त्या काळातील एक भवदभक्त होते.महाराज दर वर्षी बेलापुर- पंढरपूर आषाढी वारी करत असत.सदगुरु
शाहू महाराज बेलापूरकर यांचे नातु वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर हेही परकोटीचे विद्वान आणि पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असणारे वारकरी..शाहु महाराजांनी घालुन दिलेली पंढरीची आषाढी वारी भानुदास महाराज निष्ठेने न चुकता करत.या सगळ्याबरोबरच भानुदास महाराज म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे एक पट्टशिष्य होते.त्यांची निवृत्तीनाथ महाराजांवर गाढ श्रध्दा होती.
मला माहीती आहे आता सगळे वाचक संभ्रमात पडले असतील कि,हा निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याबद्दल लिहतोय की बेलापुरकर महाराज फडपरंपरेवर.? मंडळी तुम्ही विचार करताय तस नाहीये.निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त असणाऱ्या बेलापूरकर महाराज परंपरेतील तिसरे सत्पुरुष वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर यांनीच निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सुरु केलाय.चला तर मग बघुयात पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा इतिहास..
आठरव्या शतकातील पुर्वार्धाचा तो काळ होता.त्या आधी आपण पाहील्याप्रमाणे सर्व संतांचे पालखी सोहळे अख्या महाराष्ट्रातुन आषाढीला पंढरीस जायला सुरुवात झाली होती. भानुदास महाराज बेलापुरकर हे निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त होते.महाराजांना अस मनात वाटल की,जर सर्व संतांचे पालखी सोहळे आषाढी ला पंढरीला जात असतील. तर मग निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरीस का जात नाही? पालखी सोहळा काढायचा हा विचार करुन सदगुरु भानुदास महाराज त्रंबकेश्वर ला गेले खरे पण त्या काळी त्रंबकेश्वर येथे अनेक संतांच्या समाध्या होत्या.सदगुरु भानुदास महाराजांनी हे तिथे गेल्यावर पाहीलं.त्यांना कळेचा ना की निवृत्तीनाथांची समाधी कोणती? शेवटी सदगुरु भानुदास महाराजांनी जो पर्यंत समाधी कोणती सापडत नाही .तोपर्यंत त्या असंख्य समाध्यांसमोर अन्नपाण्याविना अनुष्ठान करण्याचे ठरविले.आणि भानुदास महाराज अनुष्ठाला बसले.अनुष्ठान काही दिवस चालले.आणि एक दिवशी अचानक एक छोटी मुलगी तिथे शेळ्या घेऊन आली.तिने भानुदास महाराजांना पाहील आणि त्यांना विचारल,"बाबा इथे काय करताय?" महाराजांनी तिला काहीच सांगीतल नाही.शेवटी ती पोरं हट्टाला पेटल्यावर महाराज म्हणाले,"बाळा मी संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी शोधतोय."
ती मुलगी लगेच म्हणाली.'अहो हे काय आत्ताच मी फुलं वाहुन आलीय त्या समाधीला'
ती एवढी बोलली आणि क्षणार्धात गुप्त झाली. ती साक्षात योगमायाच होती हे भानुदास महाराजांनी जाणल. तिला शोधल पण ती गायबच झाली.
सदगुरु भानुदास महाराज तद्नंतर समाध्यांकडे आले.तेव्हा त्यांना एका समाधीवर फुले वाहिलेले दिसले.तीच आजची आपण दर्शन घेतो ती आजही ब्रह्मगीरीच्या पायथ्याशी असलेली निवृत्तीनाथ महाराजांची समाधी!
त्यावेळीच भानुदास महाराजांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचा गाभारा "पेशव्यांच्या" आर्थिक साहय्याने बांधुन घेतला.आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका स्थापन करुन त्याच पादुका आषाढीला पंढरीस आणण्यास सुरुवात केली.ते साल म्हणजे इ.स १८४० होत. आणि ती तिथी म्हणजे आजचीच "जेष्ठ वद्य प्रतिपदा"
आता पंढरीला जायला तर हा सोहळा निघाला पण त्याकाळी पंढरीचा मार्ग तर माहीती नव्हता.तेव्हा भानुदास महाराज बेलापुरकर यांचा घोडा"लाडक्या" पुढे चालायचा आणि सोहळा त्याच्या मागेमागे चालत.जिथे लाडक्या थांबत तिथे पालखी सोहळ्याचा मुक्काम होई.खरच संतांच्या संगतीचा परिणाम किती होतो ना?
श्रीमद् भागवतात ही म्हणलच आहे-
सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगा: खगा: |
गन्धर्वाप्सरसो नागा: सिध्दच्श्रारणगुह्यका ||
(स्कंद ११,अ.१२
श्लोक ३)
अजुन एक विशेषत्व इथे मला नमुद कराव वाटत ते असं की- सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर यांनी बेलापुर-पंढरपूर आषाढी वारी चालु केली होती.मग ती वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुर पर्यंत एकटे पालखी सोहळ्यात सोबत येत.तर,बेलापुर ला सोहळा आल्यावर मगच बेलापुरकर महाराजांची दिंडी बेलापुर पासुन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला मिळत.आजही ही परंपरा अव्यावहत पणे चालु आहे.आताचे बेलापुरकर महाराज परंपरेचे विद्यमान पिठाधीपती "ह.भ.प मोहन महाराज बेलापुरकर" हे ही परंपरा चालवतात.
पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी-
हा पालखी सोहळा सुरु झाला,तेव्हापासुन पुजाधिकारी गोसावी महाराज, डावरे महाराज हेही बेलापुरकर महाजांसोबत आहेत.
सोहळ्यात रथाच्या पुढे बेलापुर पासुन बेलापुरकर महाराजांची दिंडी असते.बेलापुर च्या आधी त्रंबकेश्वर ते बेलापुर सिन्नर गावठाण,कुंडेवाडकर आणि निवृत्तीनाथ महाराज संस्थानची दिंडी रथाच्या पुढे असते.
हा सोहळा इ.स.१८४० साली सुरु झाला.त्याप्रमाणे ह्या वर्षीचा *संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १७६ वा पालखी सोहळा ठरेल*.
बेलापुरकर महाराज परंपरा,पुजाधीकारी गोसावी महाराज,व डावरे महाराजांच्या सेवा काय आहेत. याचा अभ्यास केल्यावर संत तुकोंबांचे दोन प्रमाणं मला क्षणार्धात आठवले-
वंशपरंपरा दास मी
अंकित ||
आणि
ह्याचा धरिन अभिमान |
करिन आपुले जतन ||
उद्या संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास पाहुयात...
ह.भ.प आदरणीय मोहन महाराज बेलापुरकर.
(संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख)
ह.भ.प सागर महाराज बेलापुरकर.
यांनी ही माहीती दिल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार...
© श्रीगुरूदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in

शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा -
देखोनिया पंढरपूर | जीवा आनंद अपार||१||
टाळ मृदुंग वाजती |रामकृष्ण उच्चारिती ||२||
दिंड्यापताकांचा मेळ |नाचती हरुषे गोपाळ ||३||
चंद्रभागा उत्तम| स्थानस्नाने पतीतपावन ||४||
पुंडलिका लागता पायां | चुकें येरझार वांयां ||५||
पाहता विठ्ठलमूर्ती | भानुदासासी विश्रांती ||६||
(संत श्रेष्ठ भानुदास म.)
वरील अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा संत भानूदास महाराज(आमचे पुर्वज दादा महाराज चातुर्मास्ये यांचा अवतार भानुदास महाराजांच कीर्तन पुरश्चरण पुर्ण करण्याकरिता झाला.)यांचा आहे. या सारख्या अनेक अभंगात भानुदास महाराजांनी पंढरीच महात्म्य वर्णन केले आहे. त्यावरुन आपल्याला असं म्हणता येईल कि, ‌ज्ञानोबा माऊली यांच्या घराण्याप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या घराण्यात सुद्धा पंढरीस जाण्याची,वारी करण्याची परंपरा होती.ही परंपरा पुढेही अव्याहत पणे चालु राहीली. नाथ महाराजांच्या सुद्धा अनेक अभंगात पंढरीचं वर्णन आलय.त्यामुळे पंढरीची वारी ही नाथ महाराजांच्या काळात ही त्यांच्या घराण्यात होती.
शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी त्यांच ६६ वर्षांच अवतार कार्य संपवल. आणि इसवी सनाप्रमाणे १५९९ साली पैठण नगरीत गोदावरीतीरी समाधी घेतली.नाथ महाराजांनी समाधी फाल्गुन महिन्यात घेतली आणि जेष्ठ महिन्यात त्याच वर्षी काही तज्ञ अभ्यासकांच्या मताप्रमाणे नाथमहाराजांचे चिरंचीव "हरीपंडीत महाराज" यांनी नाथ महाराजांच्या पादुका मस्तकावर ठेऊन पंढरीस जाण्यास सुरुवात केली.(नाथांचा पालखी सोहळा हा मानाचा तिसर्या क्रमांकाचा पालखी सोहळा आहे.) तर काही जाणकार तज्ञांप्रमाणे हरिपंडीत महाराज यांचे चिरंजीव नाथ महाराजांचे नातु "राघोबा महाराज" यांनी पादुका घेऊन पंढरीस जण्यास सुरुवात केली.भरपुर अभ्यास करुनही दोन्ही मते बरोबर आहेत.असंच सार समोर आल म्हणुन आपण याचा विचार जास्त न करता हरिपंडीत महाराज/राघोबा महाराज यांनी पादुका डोक्यावर घेऊन पंढरीस आषाढीस वारीला जाण्याची सुरुवात केली असे म्हणुयात.ज्यावेळेला पादुका घेऊन महाराज जात तेव्हा हा सोहळा अगदी छोटा होता. तरीही भरपुर वारकरी पादुकेसोबत असत.कालांतराने पुढील पिढीतील नाथवंशज "जानकीबाई" यांनी या वारीला पालखी सोहळ्याच स्वरुप दिलं.जानकीबाईं पासुनच नाथांचा पालखी सोहळा विशाल झाला अनेक दिंड्या या पालखी सोहळ्यास जोडल्या गेल्या.
जानकीबाईंनी तर या वारीला सोहळ्याच रुप दिलच.यानंतरही नाथांचे अकरावे वंशज श्री ह.भ.प.वै नारायण महाराज गोसावी यांनी तर हा सोहळा खुपच मोठा केला.नारायण महाराजांच्याच काळातच नाथ महाराजांचा सोहळा महाराष्ट्राला परिचीत झाला.एक सत्तर ते एेंशी वर्षापुर्वी वारकरी साम्प्रदायाचे थोर विभुती वै मामासाहेब दांडेकर यांच्या "वारकरी साम्प्रदायाचा इतिहास" या पुस्तकात मामासाहेबांनी सात संतांच्या पालखी सोहळयाचा उल्लेख केला आहे. त्यात संत ज्ञानोबा माऊली,तुकाराम महाराज व नाथ महाराज यांच्या सोहळ्या संबधीचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो तो असा-
"ज्ञानोबांच्या सोहळ्यात ५-६ हजार वारकरी असत. तर तुकोबांच्या सोहळ्यात ७००-८०० वारकरी असत" पुढे माासाहेब नाथांच्या सोहळयासंबधी लिहतात-
"नाथांचा पालखी सोहळा तर खुपच वैभवशाली आणि मोठ्या दिमाखात पार पडतो.या सोहळ्यात सुमारे ५-६ हजार वारकरी सामील होत.सोहळयात हत्ती,घोडे,शिंगवाले,तसेच विविध मानकरी मोठ्या दिमाखात निष्ठेने चालत.
हे इथे नमुद करायचा उद्देश असा कि सुमारे ७० वर्षापुर्वी लिहल्या गेलेल्या पुस्तकात मामासाहेबांनी नाथांच्या सोहळ्याच्या पुर्वीच्या वैभवाच वर्णन खुप यथार्थ रित्या केल आहे.म्हणजे पुर्वी ज्ञानोबांप्रमाणेच शांतीब्रह्म नाथ महाराजांचा पालखी सोहळा ही विशाल व बहुपरिचीत होता.
अजुन एक विशेषत्व मला नाथांच्या सोहळ्याबद्दल सांगायला आवडेल ते अस कि,सर्व संतांच्या वारीच्या काल्याच कीर्तन आपल्याला माहीती असल्याप्रमाणे गोपाळपुरास होते.मात्र नाथ महाराज परंपरेच्या काल्याचं भजन पुर्वापार चालत असलेल्या परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या देवळातील लाकडी सभामंडपात होते.
पालखी सोहळ्याचे मानकरी-
रथाच्या पुढे पहिली दिंडी पालखी सोहळ्याचे मालक
"नाथवंशज गोसावी महाराज" यांची असते. तर नंतर वऱ्हाड प्रांतातील तिन दिंड्यांचा मान असतो.या तिन दिंड्या सोहळा सुरु झाला तेव्हा पासुन आपली सेवा अव्याहत पणे देत आहेत.तसेच तिन पिढ्यांपासुन नाथांचा रथ ओढण्याचा मान 'डॅा.मंत्री' यांच्या बैलजोडीस आहे..
अशाप्रमाणे नाथांच्या अतिप्राचिन असणाऱ्या सोहळयाच स्वरुप असतं.
नाथ महाराजांच्या पालखी सोहळा नाथांनी समाधी घेतली त्याच वर्षी सुरु झाला त्याप्रमाणे यंदाच पालखी सोहळ्याचं हे ४१७ वर्ष आहे.कालच आपण पाहील की तुकोबांच्या पालखी सोहळ्यास ३३१ तर माऊलींच्या सोहळ्यास १८६ वर्षे पुर्ण होतील.म्हणजे नाथ महाराज यांचा पालखी सोहळा हा संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबां माऊलीं पेक्षाही प्राचिन आहे..
खरचं या पालखी सोहळ्यात सर्वांनी जरुर जरुर एकदा तरी जा..ज्ञानोबा-तुकाराम प्रमाणे भानुदास- एकनाथ जयजयकार करा..आपल जीवन सार्थक होईल.
एकनाथ महाराजांनी म्हणलचं आहे-
"अनुपम्य जाती पंढरीये |
अनुपम्य वस्ती होय
पंढरीये ||"

चला तर मग निघुयात...

©श्रीगुरूदास संतचरणरज
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in/

श्रीगुरू हैबतबाबा कोण होते ?

वारकरी संप्रदाय ! या अखंड हिंदुस्थानात वैचारिक दृष्टीने पसरलेला अनादी असणाऱ्या संताचा व वारकरी,फडकरी,
दिंडीकरी मंडळीचा साम्प्रदाय. अशा असणाऱ्या वारकरी साम्प्रदायाची संत ज्ञानोबा माऊली,एकनाथ महाराज,नामदेव महाराज,तुकाराम महाराज यांनी उभारणी केली.ही उभारणी इतकी मजबुत आहे जशी मजबुत इमारत.
बहिणाबाई यांच वर्णन करतात-
संत कृपा झाली | इमारत फळा आली ||१||
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिलें देवालया ||२||
नामा तयाचा किंकर | तेणे रचिलें तें आवार ||३||
जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत ||४||
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||५||
या प्रस्तुत अभंगाप्रमाणे ग्लानी आलेल्या,दुस्तर झालेला मार्ग वारकरी साम्प्रदायातील संतांनी प्रबोधन करुन स्वच्छ केला. ज्ञानोबांनंतरच्या सर्व वारकरी साम्प्रदायातील संत परंपरेची माहीती आपलेल्या या अभंगातुन कळते.
अशी दिव्य परंपरा असलेल्या या साम्प्रदायात पायी वारीला अतिशय महत्व नंतरच्या संतांनी दिले आहे.वारीची परंपरा तशी खुप जुनी म्हणजे माऊलींचे पंजोबा 'त्रंबकपंत' आपेगाव ते पंढरपूर वारी करायचे असा उल्लेख सापडतो.नंतर वारकरी साम्प्रदायातील थोर संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहुकर हे तुकोबारायांच्या सदेह वैकुंठागमनानंतर १६८५ साली म्हणजे तुकोबांच्या वैकुंठागमना नंतर ३६ वर्षांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन आळंदीत महाराज येत. आणि ज्ञानोबांच्या ही पादुका घेऊन ही वारी पुढे निघत.तेव्हापासुन
देहु -आळंदी-पंढरपुर अशी वारी सुरु झाली.नारायण महाराजांनीच ही वारी सुरु झाल्यावर वारीत "ज्ञानोबा-तुकाराम" हे भजन चालु केले.नंतर ही वारीच्या सोहळ्याची परंपरा १६८५ ते १८३० पर्यंत एकत्रित पणे चालु राहीली आणि पुढे मग देहुकर मोरे यांच्या सांगण्याहुन पुर्वी शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असणाऱ्या व नंतर विरक्त होऊन आळंदीस येऊन राहणाऱ्या थोर नामधारक,भगवद्भक्त हैबतबाबा यांनी वास्कर महाराज,शिरवळकर महाराज,व आजरेकर महाराज यांच्या समवेत इ.स १८३१ साली ज्ञानोबा माऊलींचा स्वतंत्र वारीचा पालखी सोहळा चालु केला.तेव्हापासुन माऊलींचा आणि तुकोबांचा सोहळा स्वतंत्र चालु झाला. आज आपण या सोहळ्याचं विशाल स्वरुप पाहतोच आहोत.ह.भ.प वै. तपोनिधी नारायण यांनी सुरु केलेल्या तुकोबा- माऊलींच्या संयुक्त सोहळयास,आणि आता चालु असणाऱ्या तुकोबांच्या सोहळ्यास या वर्षी ३३१ वर्षे पुर्ण होतील तर हैबतबाबांनी वास्कर महाराज,शिरवळकर महाराज,आजरेकर महाराज यांच्या समवेत सुरु केलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या वारीच्या सोहळ्यास या वर्षी १८६ वर्षे पुर्ण होतील.
ह.भ.प हैबतबाबा कोण होते? 
श्रीगुरु हैबतबाबा यांच मुळ गांव सातारा जिल्ह्यातील आरफळ.हैबतबाबा हे शिंदे सरकरांच्या दरबारी सरदार होते.त्यामुळे ते मुळ गावी न राहता ग्वाल्हेर ला असत.एकदा मुळ गावाची भेट व्हावी या उद्देशाने ते गावी जाण्यासाठी निघाले आणि रस्त्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेत त्यांच्या सोबतच वैभव पाहुन त्यांना चोर "भिल्ल" लोकांनी लुटले आणि बाबांना गुहेत कैद केले.आणि गुहेच्या तोंडावर मोठी शिळा ठेवली.
आता हैबतबाबा म्हणजे थोर भगवदभक्त ,ज्ञानोबांचे पट्टशिष्य! बाबांनी त्यांच्या ओजस्वी वाणीत माऊलींचा हरीपाठ म्हणण्यास सुरुवात केली.हा घोष अहोरात्र बाबा करत होते.योगायोग असा की, एकविसाव्या दिवशी त्या चोरांच्या नायकाची पत्नी प्रसुत झाली,तिला मुलगा झाला. त्या आनंदात त्याने त्या गुहेची शिळा बाजुला केली.तेव्हा आत सर्व जण अन्नपाण्याविना तडफडत होते.पण श्रीगुरु हैबतबाबा तेव्हाही हरीपाठ म्हणत होते.त्याने हा सर्व प्रकार पाहीला आणि प्रसन्न होऊन बाबांना त्यांच्या लुटलेल्या संपत्ती संपत्ती सहीत परत रवाना केले.
यानंतर श्रीगुरु हैबतबाबा आरफळ ला न जाता माऊलींमुळेच माझा पुनर्जन्म झाला असे मनात ठाम ठरवुन आळंदीलाच राहू लागले.आणि परत ते आरफळ ला कधीच गेले नाहीत.
या वारीच्या पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणुन श्रीगुरु हैबतबाबा यांनी शिंदे सरकार यांचे सरदार शितोळे सरकार यांच्याकडुन वारीस लागणारा लवाजमा आदी सामान घेतले. आजही हत्ती सोडले तर सर्व लवाजामा जसाच तसा अस्तित्वात आहे.त्याचबरोबर श्रीगुरु हैबतबाबा हे लष्करी सरदार असल्याने त्यांनी या वारीच्या सोहळ्यास लष्करी शिस्त लावली.ती ही आज आपणास पहावयास मिळते.
ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींचा जसा पालखी सोहळा आहे.त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज,संत सोपान काका,आदिशक्ती मुक्ताई,गोरोबा काका,संत गजानन महाराज यांचाही पालखी सोहळा त्या त्या ठिकाणाहून पंढरीस आषाढी वारीसाठी जात असतो.या सोहळ्यांच वैभव सुध्दा निराळ्या स्वरुपाच असतं.लाखो वारकरी मंडळी या सोहळ्यांत ही विठुरायाच्या भेटीची आंस उराशी बाळगुन चालत असतात.पण आज कुठल्याही वेबसाईट वर,पुस्तकांत जशी माऊलींच्या सोहळ्याच्या इतिहासाची माहीती सहजासहजी उपलब्ध आहे.तशी इतर संतांचा सोहळा कुणी चालु केला? त्याचे मानकरी कोण? ह्याची माहीती कुठेही उपलब्ध नाही.ही माहीती संकलित करुन आज जशी ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्याची लेखरुपात माहीती प्रकाशीत केली आहे.तशी अनुक्रमे प्रत्येक संतांच्या सोहळ्याची माहीती महाराष्ट्राला व जाणकार जनांना व्हावी या हेतुने रोज एका संतांच्या सोहळ्याचा इतिहास माझ्या लेखणीतुन मी लिहणार आहे.हे विशाल कार्य माऊलींच्या व सर्व संतांच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम कृपेनेच करण्याचे माझ्या मनात आले आहे.माऊली,तुकोबा,नामदेवराय,भानुदास महाराज,नाथ महाराज,निवृत्तीनाथ महाराज,सोपानकाका,आदिशक्ति मुक्ताबाई,सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये यासर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो की हे विशाल कार्य करण्याच सामर्थ्य या पामराला मिळावे.

शेवटी एव्हढेच म्हणेन-
माझ्या वडीलांची मिरासीगा देवा |
तुझी चरणसेवा साधावया ||
श्रीविठ्ठल.
@श्रीगुरुदास,संतचरणरज
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in

वारकरी संप्रदायावर आली आत्मपरीक्षण करण्याची वेळ - श्रीगुरु ह.भ.प.पु.चैतन्यमहाराज देगलूरकर