एखाद्या भागात पाऊस किती पडतो याचा आपण कधी विचार केला आहे काय?
एखाद्या भागात ७०० मीमी पाऊस पडत असेत तर दर एकरात २८,००,००० लिटर पाऊस पडतो. एखाद्या शेतक-याजवळ पाच एकर जमीन असेल तर तो पावसाच्या बाबतीत कोट्याधीशच झाला की हो. कारण त्याच्या शेतीत १ कोटी ४० लाख लिटर पाऊस पडावयास हवा. इतका पाऊस पडून सुद्धा तो स्वतःला कोरडवाहू शेतकरी म्हणवून घेत असेल तर ते त्याचे दुर्दैवच म्हणावे लागेेल. एवढ्या पावसात दोन हंगामी शेती आरामात व्हायला हवी. पण अट एकच आहे. ती म्हणजे या पडलेल्या पावसाचे योग्य जतन व्हावयास हवे. या पैकी तो फक्त १० टक्के पाणी अडवितो व बाकीचे पाणी कोठे जाते याचा तो विचारही करीत नाही. या पाण्यापैकी अर्धे पाणी सूर्यनारायण बाष्पीभवनाद्वारे घेवून जातो व उरलेले पाणी नदी नाले करीत समुद्राला परत जाऊन मिळते. निसर्ग दरवर्षी त्याच्या शेतापर्यंत पाणी विनामूल्य आणून पोहोचवितो पण तो मात्र ते अडवित नाही व शेवटी पाणी नाही म्हणून ओरडा करत बसतो. काय म्हणावे याला? हे पडलेले पावसाचे पाणी सुरक्षित ठेवायचे असेल तर ते जमिनीच्या पोटात साठवून ठेवले तरच ते कामी येवू शकते.
मा. श्री . चंद्रकांत दळवी
" भारतीय प्रशासकिय सेवा "
( सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य )
- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र