Monday 1 February 2016

सर्व विश्वाच्या कल्याण्यासाठी संतांचा अवतार असतो. - ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर


।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

साध्य

जगात तीन प्रकारचे लोक जन्माला येतात. एक, जन्माला
येतात अणि काही विशिष्ठ साध्य प्राप्त न घेता तसेच
मरतात. दोन, जन्माला येऊन काही साध्य ठरवितात
अणि प्रयत्नपूर्वक त्याची प्राप्ती करुन घेतात. तीन,
साध्य ठरवूनच जन्माला येतात.
पहिला प्रकार हा अज्ञानी जीवांचा आहे. हे केवळ कर्म
आहे म्हणून जन्माला येतात. त्यांना काही ज्ञान
उद्दिष्ट साध्य ठरवता येत नाहीत. केवळ आयुष्य आहे म्हणून
जिवंत राहतात. किड्या मुंग्यांचे , गाढव वगैरे
प्राण्यांना जसे जीवन तसेच यांचे जीवन. दुसरा प्रकार
हा साधकाचा आहे. जन्माला आल्यानंतर बुध्दीच्या
मर्यादेमध्ये जे साध्य त्यांना योग्य वाटते, ते
डोळ्यासमोर ठेवतात अणि प्रयत्नपूर्वक ते प्राप्तही करुन
घेतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, मर्यादा , संस्कार,
यावर प्रत्येकाचे साध्य अवलंबून असले. ते आपापल्या परीने
ते प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अनि हा
तिसरा वर्ग संतांचा आहे. ते साध्य ठरवूनच येत असतात.
एखादा सरकारी अधिकारी एखाद्या ठिकाणी
बदली हो ऊन आला तर त्याला नोकरी, घर वगैरेची
चिंता नसते. त्याचे सर्व तयार असते. त्याप्रमाणे संतांचे
सर्व तयार असते. कोठे जन्माला यायचे, काय व कसे
करायचे हा सर्व विचार ठरलेला असतो. त्यांना सर्व
प्राप्त झालेले असते. यावर कोणी म्हणेल, जर त्यांचे सर्व
तयार असते तर, तर जन्माला येण्याची गरज काय? कारण
ते स्वत:साठी जन्माला येतच नसतात, त्यांचा जन्म
आपल्यासाठी असतो.सर्व विश्वाच्या
कल्याण्यासाठी संतांचा अवतार असतो. आपले साध्य
कसे असावे , आपले जीवन इतरांसाठी खर्च कसे करावे
याचा आदर्श लोकांसमोर निर्माण व्हावा म्हणून ते
साध्य-साधनाचा विचार सांगतात. तसे साध्य आपण
डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. ते मोठेपणाचे !

अयं निज: परोवित गणना लघुचेतसाम।
उदार चरितणांतु वसुधैव कुटुम्बकम॥

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर