Friday 17 June 2016

जाणून घेऊ श्रीमंत शितोळे सरकार आणि माऊलींच्या अश्वा विषयी !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!

श्रीमंत शितोळे सरकार : 

बेळगाव नजीकच्या अंकलीचे श्रीमंत शितोळे सरकार यांच्याच तंबूत श्री माऊलींचा रात्रीचा मुक्काम असतो. श्री माऊलींचा जरीपटका, घोडेस्वार आणि श्री माऊलींचा अश्वदेखील श्री शितोळे सरकार हेच सेवा म्हणून रुजू करतात. श्री माऊलींसाठी सकाळी ६.०० वाजता प्रसादही शितोळे सरकार यांचेकरवीच असतो. ही सर्व सेवा इ.स. १८३१ पासून आजतागायत अखंडपणे सुरू आहे. म्हणूनच वाखरी येथून पंढरीपुरी जाताना श्रींच्या पादुका श्री शितोळे सरकारांच्या गळ्यात बांधण्यात येतात. हा त्यांचा मान आहे.

पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
  इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो. निर्जला एकादशी ला अंकली हुन प्रस्थान होते आळंदीच्या दिशेने .

माहिती साभार - वारी संतांची ( वारकरी संकेत स्थळ)

- Varkariyuva.blogspot.in