Wednesday 15 January 2014

चिरंजीवपद - संत एकनाथ

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
माणवास भगवद्भक्तीचा अधिकार आहे. भक्तीमार्गातील शेवटची भक्ती आत्मनिवेदन अनुभवल्याशिवाय मनुष्य जन्माचेसार्थक नाही हे सकल संतानी विविध पध्‍दतीने पटवून दिले आहे. अन्यथा जीवाला जन्ममरणाच्या फे-यात सुटता येणार नाही.याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार संभ्रम भोगू नका॥भक्तीमार्गातील आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी भक्तांना भक्तीमार्गात येणारे अडथळे, धोके कशात? व अनुभव कसे असतात? हे जाणून सावधपणे भक्ती जगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी चिरंजीवपद द्वारे बहुमोल मार्गदर्शन केले आहे. तुका म्‍हणे सांडा घाटे । तेणे नका भरु पोटे॥संत एकनाथमहाराजांचा चिरंजीव पद रुपाने सकल भक्‍तीमार्गस्‍थांसाठी मोलाचा संदेश आहे. यावर आत्मियतेने विश्वास व शब्‍द एक एक मंत्र असुन त्यानुसारच्या अनुकरणाने साधक संतअनुभूतीचे चिरंजीव पदास पात्र होतो. चिरंजीव पदाचा अर्थ तर इतका सरळ आणि सोपा हे कि वाचता क्षणी आपणास कळून जाईल आणि नक्कीच भक्ती मार्गात येणारे अडथळे दूर होतील 
चिरंजीवपद
चिरंजीव पद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका॥१॥आधीं पाहिजे अनुताप । तयासें कैसें स्वरुप ।नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख॥२॥म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातीचा गेला । करीं वहिला विचार॥३॥ऐसा अनुताप वाहती चित्तां । वेराग्यं ये त्याचिये हातां । वैराग्या्ची कथा । किंचित आतां पै बोले॥४॥तें वैराग्या बहुतांपरी । आहे गा तूं अवधारीं । सात्विक राजस तामस त्रिप्रकारी । योगेश्वरी बोलिजे ।५॥राजस तामस त्याग । तेणें न कळे परमार्थ मार्ग । करावा सात्विक त्याग । सुख अव्यंग मग लाहे॥६॥प्रथम राजस तामस दोन्ही । अल्प बोलो उकलोनी । जें सात्विका लागोनी । अंतरींहुनी त्यागावा॥७॥नेणें वेधविध विचार । नाहीं सत्संग सधर । कर्मभ्रष्ट साचार । तो अपवित्र तामस॥८॥त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूज्यता भोगणें । शिष्या ममता धरुन राहणें । तो जाणणें राजस॥९॥ऐसें वैराग्य राजस तामस । तो त्याग न माने संतास । तेने भेटे कृष्ण परेश । अनर्थासी मूळ हें॥१०॥आतां वैराग्य शुध्द सात्विक । जे जगद्वंद्य मानी यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया॥११॥भोगेच्छा विषयिक । ते तो सांडी सकळिक । प्रारब्धें प्राप्ता होतां देख । तेथुनि निष्टंक मन काढी॥१२॥विषय पांच आहाती । ते अवश्य साधका नाडिती । म्हणोनी लागों न द्यावी प्रीती । कोणे रीती तें ऐक॥१३॥जेणें धरिला शुध्द परमार्थ । त्यासी जनमान हा अनर्थ । तेणे वाढे विषय स्वा्र्थ । ऐका नेमस्त विचार॥१४॥वैराग्य पुरुष देखुनी । त्याची स्तुती करती जनीं । एक सन्मानें करुनी । पूजेलागूनि पैं नेती॥१५॥तंव त्या्चे वैराग्य‍ कोमळ कंटक । नेट न धरी निष्टंक । देखोनि मान स्तुती अलौकिक । भुलला देख पैं तेथें॥१६॥जनस्तुती लागे मधुर । म्हणती हा उध्दरावया हरीचा अवतार । आम्हांलागी जाहला स्थीर । धरी अपार शब्देगोडी॥१७॥हा पांच विषयांमाजीं प्रथम । शब्द विषय उपक्रम । मग स्पर्श विषय संभ्रम । झोंबे परम त्या् कैसा॥१८॥नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रेप्रती । नरनारी आंग शुश्रुषा करिती । तेणें धरी प्रीती स्पर्शाची॥१९॥रुप कैसा गोंवी । वस्त्रें भूषणें देती बरवी । तेणें सौंदर्य करी जीवीं । देहभावे श्लाघ्यता॥२०॥रुप विषय ऐसा जडला । मग रस विषय कैसा झोंबला । जैसें आवडे तें त्याला । गोड गोड अर्पिती॥२१॥ते रस गोडी करितां । घडी न विसंबें धरी ममता । मग गंध विषय ओढीता । होय तत्वतां त्याग कैसा॥२२॥आवडे सुमन चंदन । बुका केंशर विलेपन । ऐसें पांचही विषय संपूर्ण । जडले जाण सन्मानें॥२३॥मग जे जे जन वंदिती । तेवी त्या ची निंदा करिती । परी अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चिती पूजकाची॥२४॥म्हणाल जो विवेकी आहे । त्यासी जनमान करील काय । हें बोलणें मुर्खाचे पाहे । तया चाड आहे मानाची॥२५॥ज्ञात्यासी प्रारब्ध गती । मान झाला तरी नेघो म्हणती । तेथेंचि गुंतोनी न राहती । उदास होती तात्काळ॥२६॥यापरी साधकाच्या चित्ता । मान न सोडी सर्वथा । जरी कृपा उपजेल भगवंता । परी होय मागुता विरक्ता॥२७॥तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगीं राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची॥२८॥ऐसा परमार्थ साधकासी । जन मान्यता विघ्न त्यासी । तेणें लुब्धा विषयासी । या चिन्हासी बोलिजे ।२९॥न सांडी स्वतंत्र फड । अंगी अहंता येईल वाड । धरुनी जीवीकेची चाड । न बोले गोड मनधरणी॥३०॥नावडे लौकिक परवडी । नावडे लेणीं लुगडी । नावडें परान्न गोडी । द्रव्या जोडी नावडे॥३१॥नावडे प्रपंच जनीं बैसणे । नावडे कोणाचे बोलणे । नावडे योग्यता मिरविणें । बरवें खाणे नावडे॥३२॥नावडे स्रियांत बोलणें । नावडे स्रियांते पाहणें । नावडे स्रियांचे रगडणें । त्यांचा स्पर्श नावडे॥३३॥नको नको स्रियांचा सांगात । नको नको स्रियांचा एकांत । नको नको स्रियांचा परमार्थ । करतीं आघात पुरुषासी॥३४॥म्हणती गृहस्थ साधकें । स्रिया सांडुनी जावेकें। येच अर्थी उत्तर निकें । ऐक आतां सांगेन॥३५॥तरी स्वस्त्री वांचुनी । नाताळावी अन्य कामिनी । कोणे स्रियेसी संनिधवाणी । आश्रय झणी न द्यावा॥३६॥स्वस्त्रीसही कार्यापुरते । पाचारावें स्पर्शावे निरुतें । परी आसक्त होऊ नये तेथें । अती सर्वथा न गुंतावे॥३७॥जरी स्रिया सेवा करिती । भक्ती ममता उपजविती । तरी त्यांच्या संगती । शुध्द परमार्थी न बैसे॥३८॥अखंड एकांती बैसणें । प्रमदा संगे न राहणें । जो निसंगी निराभिमानें । त्या पैं बैसणें सर्वदा॥३९॥कुटुंब आहाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे । ऐसें स्थिती जें वर्तणें । तें जाणणें शुध्द वैराग्या॥४०॥ऐसी स्तिती नाही ज्यासी । कृष्ण प्राप्ती कैंची त्यासी । म्हणुनी कृष्णभक्तासी । ऐसी स्तिती असावी ।४१॥या स्तितीवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे अज्ञान । सकळ मूर्खाचे तो अधिष्ठान । लटकें तरी आण देवाची॥४२॥हे बोलणे माझिये मतीचें । नव्हेचि गा साचें । कृष्णें सांगितलें उध्दवा हिताचें । ते मी साचें बोलिलों॥४३॥साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पे न पवे कृष्णचरण । माझे काय जाईल जाण । मी बोलेन उतराई ॥४४॥साधावया वैराग्य जाण । मनुष्यदेही करावा प्रयत्न । सांगे एका जनार्दन । आणिक प्रयत्न असे ना ॥४५॥
सर्वाना नम्रतेची विनंती आहे कि हे अमुल्य असा संत साहित्याचा साठा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 
आपले नम्र ,
वारकरी संप्रदाय युवा मंच . महाराष्ट्र राज्य