Friday 27 January 2017

आत्मस्तुती - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर


माणसाच्या विद्यार्जनामध्ये आणखी एक शत्रु आहे ती म्हणजे स्तुती !
ही स्तुती माणसाला विद्यार्जनापासून दूर नेते.कारण स्तुती माणसाच्या मनात अहंकार निर्माण करते आणि अहंकार आला की विद्या येत नाही.
ही स्तुती दोन प्रकारची असते.एक आत्मस्तुती आणि दुसरी इतरांनी केलेली.काही लोकांना स्वत:चीच स्तुती स्वत: करून घेणे फार आवडते.एखादा विद्यार्थी खुप पाठांतर,अभ्यास करेल .ती चांगलीच गोष्ट आहे.त्याचा त्याच्या जीवनावर चांगला परिणाम होईल,पण आपण केलेले कष्ट,त्याला प्राप्त झालेले फऴ,याची तो स्वत:च स्तुती करू लागला तर ते योग्य नाही.माझ्याएवढी अभ्यास कोणी करत नाही,माझ्याएवढे पाठांतर कोणालाच नाही वगैरे तो स्वत:चीच स्तुती करू लागला तर ते त्याच्या पुढच्या जीवनाच्या दृष्टीने चांगले नाही.कारण त्या स्तुतीने अहंकार निर्माण होतो आणि ' आपणास सर्व कऴते ' या अहंभावाने त्याचे शिक्षण थांबते.म्हणून महाभारतामध्ये म्हंटले आहे,
आर्येण हि न वक्तव्या कदाचित्स्तुतिरात्मन: ।
आर्य मनुष्याने कधीही आत्मस्तुती करू नये आणि विद्यार्थ्याने तर मुऴीच करू नये. आणि स्तुतीचा दुसरा प्रकार म्हणजे इतरांकडून होणारी स्तुती ! पुष्कऴ वेऴा विद्यार्थ्याचे पालकच त्याची इतकी स्तुती करतात,की तो विद्यार्थी स्वत:स शहाणा समजू लागतो.आपणांस आपल्या मुलाचे कौतुक वाटणे ( जर तो हुशार असेल तर ) स्वाभाविक आहे,पण लगेच त्याची स्तुती करू नये.एखाद्या यशानंतर आपले कौतुक होते,पण विद्यार्थ्याने ती स्तुती मनावर घेऊ नये.ती गोड वाटते,पण घातक असते. ' स्तुती परविया मुखे रूचिकर । '
असे श्रीतुकाराम महाराज सांगतात.पण ती घातक असते म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ' पूज्यता डोऴा न देखावी । स्वकीर्ति कानी नायकावी ।' म्हणून उपदेश केला आहे.म्हणून दुसऱ्यांनी केलेली स्तुती हीदेखील विद्येची शत्रूच आहे.त्यामुऴे माज निर्माण होतो.श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ' तैसा माजे स्त्रिया धने। विद्या स्तुती बहुने माने ।' आणि विद्येसाठी ही स्तुती घातक आहे.स्तुतीने संकोच निर्माण व्हावा.अहंकार नव्हे ! म्हणून विद्यार्थ्याने या शत्रूपासून सावध राहावे.माणूस अनंत काऴाचा विद्यार्थी आहे !

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

ह.भ.प.प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar